‘नैना, अंकिता, श्रद्धा,उर्वशी… कितीतरी नावे मरणाऱ्या हिंदू बायकांची, मारणारे कोण तर आफताब, दिलदार, वसीम, किंवा असलेच कोणतरी’ 

मुंबई – केवळ राज्यातच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून देशभरात उघडकीला येत असलेल्या काही गुन्ह्यांमुळे लव्ह जिहादचा मुद्दा चर्चेत आहे. नुकत्याच समोर आलेल्या श्रद्धा वालकर प्रकरणामुळे हा मुद्दा प्रखरतेने समोर आला आहे. अनेक हिंदू मुली या अशा प्रकरणात बळी ठरत असल्याचे सध्या समोर येत आहे. या प्रकरणातील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी यासाठी मोर्चे देखील काढले जात आहेत. एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला आता लेखिका शेफाली वैद्य यांनी एक फेसबुक पोस्ट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पाहूया नेमकं काय म्हटलं आहे शेफाली वैद्य यांनी.( shefali vaidya’s fb post on love jihad )

शेफाली वैद्य यांची फेसबुक पोस्ट 

अस्वस्थ आहे फार. बातमी मागून बातमी कानावर आदळतेय. नोव्हेंबर मध्ये आफताब अमीन पूनावाला नावाच्या नराधमाने श्रद्धा वालकर ह्या मुलीचा खून करून तिच्या देहाचे ३५ तुकडे केले ही बातमी आपण सर्वांनीच वाचली, त्यावर आपापल्या पद्धतीने खूप चर्वितचर्वणही केले. आफताबला अटकही झाली, पण श्रद्धाच्या देहाचे सर्व तुकडे अजून सापडलेही नाहीत तोवर दर चार-पाच दिवसांनी कुणाच्या तरी खुनाची नवी बातमी येतेय.

श्रद्धा वालकरचा खून उघडकीला आला त्याच्या दुसऱ्या का तिसऱ्याच दिवशी बातमी आली की निधी गुप्ता नावाच्या लखनऊच्या मुलीला मोहम्मद सुफीयां ह्या नराधमाने त्याची गर्लफ्रेंड बनून धर्म परिवर्तन करायला तयार होत नाही म्हणून चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं. ती मुलगी मेली. तिचं वय होतं फक्त १९ वर्षे! नंतर बातमी आली झारखंडची. तिथल्या सौरा पहाडी ह्या अत्यंत छोट्या, डोंगरात राहणाऱ्या अनुसूचित जमातीतली रबिता ही फक्त २२ वर्षांची मुलगी. ती प्रेमात पडली कुणा दिलदारच्या. त्याचं एक लग्न आधीच झालं होतं. दिलदारशी निकाह करून दहा दिवस पण झाले नव्हते रबीताचे, दिलदार आणि त्याच्या घरातल्या लोकांनी संगनमत करून ह्या पोरीला मारली आणि तिच्या देहाचे पन्नास तुकडे केले कटरने आणि ते फेकून दिले उकिरड्यावर. ते तुकडे भटकी कुत्री खायला लागली तेव्हा कळलं रबिताचं काय झालं ते.
पुढची घटना शेजारच्या छत्तीसगढची. तिथली नीलकुसूम नावाची मुलगी. अनुसूचित जमातीतलीच पण आता ख्रिस्ती झालेली. ती प्रेमात पडली कुणा शाहबाझच्या. तो छत्तीसगढमध्ये कामावर होता. नंतर गुजरातला बदलून गेला. नीलकुसुम त्याचे फोन उचलत नाही म्हणून हा शाहबाझ विमानाने परत छत्तीसगढला आला आणि स्क्रू ड्रायव्हरने पन्नास वेळा भोसकून त्याने नीलकुसूमचा खून केला.

ह्या पुढची घटना मुंबईची. रियाझ खान हा चाळीस वर्षांचा जिम ट्रेनर. आधीची तीन लग्ने झालेली तरीही उर्वशी वैष्णव नावाची मूळची बुंदी, राजस्थानमधली हिंदू बाई ह्याच्या प्रेमात पडली. लिव्ह-इन मध्ये राहू लागली. तिला ह्याच्याशी लग्न करायचं होतं, पण रियाझला ह्या काफिर बाईशी नुसती मजा मारायची होती. तिला फिरायला नेतो म्हणून रियाझ मुंबईबाहेर घेऊन गेला, गळा दाबून मारलं तिला आणि बॉडी तिथेच जंगलात टाकून परत घरी आला. तिच्या चपलेवरून पोलिसांनी ह्या केसचा उलगडा केला.

ही घटना उत्तर प्रदेश मधल्या लखीमपूर खेरीची. उमा शर्मा नावाची हिंदू बाई. मोहम्मद वसीम नावाच्या माणसाच्या प्रेमात पडली. तो इलेक्ट्रीशियन. त्याच्या नादी लागून उमाने घरच्यांशी संबंध तोडले, ह्याच्या बरोबर पळून गेली, धर्म बदलून अक्सा फातिमा झाली. वासिम बरोबर निकाह करून त्याच्या एका खोलीत संसार करू लागली, त्याच्या दोन मुलांची आई झाली. अर्थात प्रेमाचा मुलामा उडाल्यावर नवरा-बायकोत भांडणं होऊ लागली. अश्याच एका भांडणानंतर वासिमने बायकोला त्याच्या चार आणि दोन वर्षांच्या मुलांसमोर तिला विजेचा धक्का देऊन तिचा खून केला आणि आपल्याच खोलीच्या एका कोपऱ्यात तिला पुरली. त्याच खोलीत गुन्हा उघडकीला येईस्तोवर राहिला आपल्या मुलांना घेऊन. आईला जिथे पुरलंय त्यावर सतरंजी टाकून तिथेच मुलांना झोपवलंही असू शकेल!

ह्या सर्व क्रूर खुनाच्या घटना फक्त गेल्या एका महिन्यातल्या आहेत. सर्व खऱ्या आहेत. एक गूगल सर्च केला तर तुम्हाला सर्व माहिती मिळू शकेल, पण दुर्दैवाची गोष्ट ही आहे की श्रद्धा वालकर आणि रबिता सोडल्यास बाकी सर्व खून राष्ट्रीय मीडियाने कव्हर केलेलेच नाहीत, कारण आपल्याला आता ह्या घटनांची सवय झालेली आहे.

नैना, अंकिता, निकिता, खुशी, श्रद्धा, रबिता, उमा, उर्वशी… कितीतरी नावे. मरणाऱ्या हिंदू बायकांची. मारणारे कोण तर आफताब, दिलदार, वसीम, शाहबाझ, सुफीयां किंवा असलेच कोणतरी. अश्या ‘इंटर-फेथ’ खुनाच्या घटनांमध्ये सहसा मरणारी बाई हिंदूच का असते आणि मारणारा पुरुष मुसलमानच का हा प्रश्न कुठल्याही सुजाण माणसाला पडेल पण बोलायचं नाही कुणी ह्या विषयावर. कारण बोललात तुम्ही तर सर्वधर्मसमभावाचे स्वघोषित ठेकेदार तुम्हालाच विचारणार, ‘तुम्ही द्वेष का पसरवताय?’ हिंदू बायकांचा खून करणे हा द्वेष नाही, पण त्या बाबत बोलणे म्हणजे द्वेष!

वर हे निर्लज्ज लोक तोंड वर करून म्हणणार ‘१०० कोटी लोकांच्या देशात अश्या पाच सहा घटना घडणारच महिन्याला’. ह्या निर्लज्ज युक्तिवादात आणि मुंबईत दहशतवादी हल्ले झाले तेव्हा ’बडे शहरमें ऐसी छोटी छोटी घटनाये होतीही हैं’ ह्या तत्कालीन काँग्रेस सरकारच्या गृहमंत्र्यांच्या निर्लज्ज युक्तिवादात फरक काय आहे? बरं, हा युक्तिवाद करणारे लोक तेच असतात जे भारतात कुठेही बलात्काराची घटना घडली की पूर्ण देशाला ’रेप कैपिटल ऑफ दि वर्ल्ड’ असे नाव देऊन लेख लिहितात!

लवजिहाद ह्या शब्दाची पुरोगामी लोकांना फार ऍलर्जी आहे, तेव्हा आपण त्यांचा आवडता शब्द, ‘इंटर-फेथ’ वापरू. असे ‘इंटर-फेथ’ खून होण्याचं प्रकरण आजकाल फार वाढलंय. ह्या फक्त रिपोर्टेड घटना आहेत, अशी कित्येक ‘इंटर-फेथ’ घरे असतील जिथे बाईची किंकाळी कायमची बुरख्याआड दडलेली असेल, एकदा निकाह करून गेल्यावर बाईचं पुढे काय होतं हे कुणाला माहिती? पण खुनाची, खुनी हल्ल्यांचीच प्रकरणं इतकी आहेत की तुम्ही विचारी असलात तर तुम्हाला ह्याची दखल घ्यावीच लागेल.
‘ह्यात हिंदू-मुस्लिम काय आहे, हा तर बाईवरचा सनातन अन्याय आहे’ असं म्हणणारा एक ‘पुरोगामी’ उपवर्ग आहे जो स्वतःला फेमिनिस्ट म्हणवतो. बाईवरती अन्यायाच्या घटना होतात, अनेक हिंदू घरांमध्येही होतात हे कुणीच नाकारत नाही, पण गेल्या दहा वर्षातल्या अश्या ‘इंटर-फेथ’ गुन्ह्यांची यादी काढून तपासा हिंमत असेल तर आणि शोधा किती केसेस मध्ये खून झालेली, खुनी हल्ला झालेली बाई हिंदू आहे आणि मारणारा कुणी आफताब किंवा दिलदार!

सत्याकडे डोळेझाक केली म्हणून सत्य असत्य ठरत नाही, ती तुम्ही स्वतःची केलेली विवंचना असते. आज आग शेजारच्या मोहल्ल्यात आहे, तुम्हाला फक्त धूर दिसतोय, पण ‘आग नाहीच लागलेली, कुणीतरी मजेसाठी शेकोटी पेटवलीय’ असं म्हणत तुम्ही काहीच नाही केलं तर कधी ना कधी तरी ती आग तुमच्या घरापर्यंत येणारच आहे, आणि तेव्हा खूप उशीर झालेला असेल. बहुत काय लिहिणे? – शेफाली वैद्य