देवेंद्रजीसह Bjp च्या तमाम नेत्यांचा गजनी झालाय का? सुषमा अंधारे यांचा सवाल

पुणे :  बागेश्वरधामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Maharaj) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संत तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली असून जगतगुरू संत तुकाराम (Tukaram Maharaj) महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली आहे. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं आहे.

दरम्यान, या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून  वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि ज्यांच्यावर संतांचा अपमान केल्याचा आरोप आहे अशा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,  देवेंद्रजीसह Bjp च्या तमाम नेत्यांचा गजनी झालाय का? बागेश्वर महाराष्ट्रातल्या संतश्रेष्ठांचा अपमान करत असताना आता तुषार भोसले, मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी सोयीस्कर मन बाळगून का बसले असतील बरे? देवेंद्र फडणवीसजी गृहखातं तुमच्या कडेच आहे ना? असा खोचक सवाल देखील त्यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.

“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे ते म्हणाले.