“बागेश्वर बाबा जिथे दिसेल, तिथे ठोकून काढा”; तुकाराम महाराजांवरील विधानानंतर अमोल मिटकरी आक्रमक

पुणे :  बागेश्वरधामचे (Bageshwar Dham) धीरेंद्र शास्त्री महाराज (Dhirendra Maharaj) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संत तुकोबांसंदर्भात बोलताना धीरेंद्र महाराजांची जीभ घसरली असून जगतगुरू संत तुकाराम (Tukaram Maharaj) महाराजांच्या पत्नीवर टिपण्णी केली आहे. तुकोबारायांची पत्नी त्यांना रोज मारायची म्हणून ते परमेश्वराच्या चरणी लीन झाले, असं वादग्रस्त वक्तव्य या बाबांनी केलं आहे.
दरम्यान, या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून सर्वप्रथम भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी संत तुकाराम महाराजांची आणि वारकऱ्यांची धीरेंद्र शास्त्री यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. बागेश्वर बाबांकडून तुकोबांचा अपमान झाल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या विधानावरून संताप व्यक्त केला आहे. धीरेंद्र कृष्ण महाराज जिथे दिसेल तिथे ठोकून काढा, असं ते म्हणाले.धीरेंद्र शास्त्री सारखी कोल्हेकुई जेव्हा सुरू असते, त्यावर तुकोबांनी सांगितलं आहे. ”अवघे कोलियाचे वर्म अंडी घातलिया, तोंडी खीळ पडे” अशा बदमाशांच्या नाजूक भागावर हल्ला केला तर यांचं थोबाड बंद होतं. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला आणि त्याचा अधिष्ठानाला जर असा पापी आणि बेअक्कल असलेला महाराज काही बोलत असेल, तर मला असं वाटतं की वारकरी सांप्रदायाने याची गंभीर दखल घ्यावी. हा जिथे दिसेल, तिथे याला ठोकून काढा”, असे ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री ?धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये ते संत तुकाराम महाराज यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. संत तुकाराम महाराज यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची, असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केला आहे.

“संत तुकाराम महाराज महाराष्ट्रातील एक महात्मा आहेत. त्यांची पत्नी त्यांना रोज मारहाण करायची. याच कारणामुळे त्यांना एका व्यक्तीने विचारले की तुमची पत्नी तुम्हाला रोज मारहाण करते, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का? या प्रश्नाचे संत तुकाराम महाराजांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देवाची कृपा आहे की मला मारहाण करणारी पत्नी भेटली. मला प्रेम करणारी पत्नी भेटली असती, तर मी देवाच्या प्रेमात पडलोच नसतो. मी पत्नीच्याच प्रेमात गुरफटून गेलो असतो. मला मारहाण करणारी बायको मिळाली आहे, त्यामुळे मला प्रभू राम यांची भक्ती करण्याची संधी मिळते, असे संत तुकाराम महाराज म्हणाले होते.” असे ते म्हणाले.