उष्माघात टाळण्यासाठी ‘अशी’ घ्या स्वतःची काळजी

नागपूर : नागपूर शहरातील तापमान जसजसे वाढू लागले आहे. तसे उष्णतेमुळे होणा-या दुष्परिणामांचा धोका सुद्धा वाढू लागला आहे. उष्माघातामुळे जीविताही धोका निर्माण होउ शकतो, त्यामुळे उष्माघात प्रतिबंधक नियमांचे पालन करून प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

नागपूर शहरातील तापमान ४२ ते ४३ अंशाच्या दरम्यान असल्यामुळे उष्माघाताचा धोका जास्त् संभावतो. नागरिकांनी कामाशिवाय उन्हात निघण्याचे टाळावे. उन्हात जाण्याचे वेळ आल्यास योग्य खबरदारी घेतली जावी. उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे, स्वत:सह इतरांच्याही तब्येतीची काळजी घ्यावी, हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावीत, बाहेर जाताना गॉगल्स, छत्री किंवा हॅट, बूट किंवा चप्पलचा वापर करावा, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करताना हॅट किंवा छत्रीचा वापर तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमीत पिणे, घर थंड ठेवण्यासाठी ओलसर पडदे, पंखा, कुलर आदींचा वापर करावा, असेही  आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात येत आहे.

उष्माघात टाळण्यासाठी उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे, उन्हात कष्टाची कामे करणे टाळा, लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नका,  गडद,  घट्ट व जाड कपडे परिधान करणे टाळा, उन्हात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा, मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स ही पेय टाळा, शिळे आणि उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा, असेही आवाहन आरोग्य विभागाद्वारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बहिरवार आणि सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी केले आहे.