Asia Cup: टीम इंडिया नव्हे हा तर मुंबई इंडियन्सचा संघ… कर्णधार रोहित शर्माने साधला डाव?

आशियाई क्रिकेटची महान लढाई म्हणजेच आशिया कप (Asia Cup) 30 ऑगस्टपासून खेळला जाणार आहे. बीसीसीआयने या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India For Asia Cup) केली आहे. BCCI ने 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी नुकताच 17 सदस्यीय संघ निवडला आहे. मात्र या संघ निवडीनंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स ट्रेंडिंगला आले आहे. कारण आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात अधिकतर आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्समधील (Mumbai Indians) सदस्य आहेत.

आशिया चषकासाठी निवडण्यात आलेल्या संघात लेग-स्पिनर युझवेंद्र चहल, यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा 2023 आशिया चषक स्पर्धेसाठी भारताच्या 17 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला नाही. मात्र, सॅमसन बॅकअप यष्टिरक्षक म्हणून संघाशी जोडला जाईल.

विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियात परतले आहेत. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीशी झुंजत होते. मात्र आता दोन्ही खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त आहेत. आयपीएल 2023 च्या हंगामात केएल राहुल शेवटचा मैदानावर दिसला होता. केएल राहुलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध दुखापत झाली होती. त्यानंतर तो संपूर्ण स्पर्धेत खेळू शकला नाही. मात्र, केएल राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनामुळे टीम इंडियाची मधली फळी खूपच मजबूत दिसत आहे.

रोहित शर्माने साधला डाव?
दुसरीकडे या संघात असे 9 खेळाडू आहेत, जे मुंबई इंडियन्समध्ये खेळले आहेत. हे खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात किंवा यापूर्वी ते त्याचा भाग होते. विशेष म्हणजे रोहित शर्मा स्वतः आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, आशिया कपमध्ये भारताच्या संघात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारे इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचाही समावेश आहे. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनाही या संघात स्थान मिळाले आहे.

अशा प्रकारे, 17 सदस्यीय भारतीय संघात एकूण 9 खेळाडू आहेत. जे आधी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या घोषणेनंतर चाहते सोशल मीडियावर कॅप्टन रोहितनं डाव साधला का अश्या प्रतिक्रिया देत आहेत.