10 मार्चला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करेल – मायकल लोबो

पणजी : कळंगुटमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या मायकेल लोबो यांनी गुरुवारी भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात असल्याच्या अफवा फेटाळून लावल्या आणि १० मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल लागल्यास संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा दावा कॉंग्रेस करेल असा विश्वास व्यक्त केला.

लोबो यांनी गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना भाजप अफवा पसरवण्यात माहिर आहे, त्यामुळे अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सांगितले. यावेळी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ नेते दिगंबर कामत, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी जि.प. सदस्य मोरेनो रेबेलो, उपाध्यक्ष आल्तिनो गोम्स उपस्थित होते.

लोबो म्हणाले की, निकाल येण्यापूर्वी अफवा पसरवण्यात आल्या आहेत. गोव्यातील लोकांना माहीत आहे की ही अफवा कोण पसरवत आहे. अशा अफवांना बळी पडू नका. काँग्रेस पक्ष कोणीही सोडणार नाही. अंमलबजावणी संचालनालय किंवा इतर एजन्सींचा वापर करून कोणतेही दबाव आणण्याचे डावपेच भाजपला आजमावू द्या. आम्ही सर्व एकत्र आहोत आणि काँग्रेस पक्ष सोडणार नाही. असे लोबो म्हणाले.

दुपारी ३ वाजेपर्यंत निकाल लागल्यास आम्ही ५ वाजेपर्यंत सरकार स्थापन करण्याचा दावा करून स्थिर सरकार देऊ. यंदा भाजप विरोधी पक्षात असेल असा पूर्ण विश्वास आम्हाला आहे. असे लोबो म्हणाले.इतर पक्षाचे नेते काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे लोबो म्हणाले. त्यांना भाजपला पाठिंबा देण्यात रस नाही. एकही अपक्ष आमदार किंवा मगो पक्ष भाजपच्या जवळ जाणार नाही कारण या प्रादेशिक पक्षाच्या पाठीत भाजपने वार केले आहेत. त्यांच्यावर आता कोणीही विश्वास ठेवत नाही. असे ते म्हणाले.

सुदिन ढवळीकर आणि दीपक ढवळीकरही भाजपसोबत जाणार नाहीत कारण भाजपने त्यांच्या पाठीत दोनदा वार केले होते. असे ते पुढे म्हणाले. लोबो म्हणाले की, गोव्यातील जनता 10 मार्चपासून आनंदी होईल कारण त्यांना आता भाजपपासून आणखी एक मुक्ती मिळणार आहे.मुख्यमंत्रीपदाचा निर्णय काँग्रेस पक्ष व विधिमंडळ पक्ष घेईल असेही लोबो म्हणाले.