‘आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले’

मुंबई – पत्राचाळ प्रकरणी (Patra Chaal Land Scams) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांच्या घरी ईडीची (ED ) टीम दाखल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘ईडीने कारवाई केली तरीही शिवसेना सोडणार नाही. मरेन पण शरण जाणार नाही’ असं म्हणत संजय राऊत यांनी ईडीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

पत्राचाळ प्रकरणामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर आले होते. ईडीने संजय राऊत यांची चौकशीही केली होती. पण आज सकाळी अचानक ईडीचे पथक राऊतांच्या घरी दाखल झाले. पत्राचाळ प्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊतांच्या भांडुपच्या घरी ईडी पथक तळ ठोकून आहे.

दरम्यान, ईडीचा एवढा मोठा छापा पडतो त्यावेळी अटक होण्याची शक्यता अधिक असते. संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भोंग्यामुळे शिवसेनेत फूट पडली. त्यामुळे सामान्य शिवसैनिकासह 40 आमदार आणि 12 खासदारही आनंदी असतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केली.

राऊत यांच्याकडे प्रखर वाणी आणि लेखणीवर प्रभुत्व आहे, त्याआधारे त्यांनी स्वत: ची सुटका करून घ्यावी असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आमचं पोस्टमार्टेम करायला निघालेल्या संजय राऊत यांचं पोस्टमार्टेम तपास यंत्रणांनी सुरू केले असल्याचे शिरसाट यांनी म्हटले. एक दिवस उद्धव ठाकरे हेच संजय राऊत यांना पक्षातून बाहेर काढतील असे शिरसाट यांनी म्हटले. राष्ट्रवादीच्या नादी लागून राऊतांनी शिवसेनेचे वाटोळे केले असल्याचा आरोप त्यांनी केला.