‘पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात अडथळा आणणे, म्हणजे…’; नारायण राणेंची संतप्त प्रतिक्रिया

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) रद्द करण्यात आलीय. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. शेतकरी आंदोलनानंतरची मोदींची ही पहिलीच रॅली होती.

गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.

दरम्यान, यानंतर मोदी आपल्या पंजाब दौरा रद्द करत ते पुन्हा भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथे त्यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केलीय. ‘आपल्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा की, मी भटिंडा विमातळावर जिवंत पोहोचू शकलो’, अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी संताप व्यक्त केल्याचं समजतं.

दरम्यान, या सर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दौऱ्यात अडथळा आणण्याची मानसिकता निंदनीय आणि लज्जास्पद आहे. पंजाबच्या प्रगतीत अडथळा आणण्याबरोबरच हा राज्यातील जनतेचा अपमान आहे.