आदिवासी मंत्री सभागृहात चुकीचे उत्तर देऊन राज्याची दिशाभूल करत आहेत – दिलीप वळसे पाटील

मुंबई   – महाराष्ट्रात कुपोषणाने मृत्यू झाला नाही हे संबंधित आदिवासी मंत्री सभागृहात चुकीचे उत्तर देऊन राज्याची दिशाभूल करत असल्याचा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला. कुपोषणाने मृत्यू झालेल्या बालकांच्या प्रश्नावर बुधवारी चर्चा झाली मात्र ती अर्धवट असल्याने कुपोषणाने किती बालकांचा मृत्यू झाला याची सत्य आकडेवारी सभागृहात संपूर्ण माहितीसह आली पाहिजे यासाठी हा प्रश्न राखून ठेवण्यात आला होता. त्यावर आज सभागृहात चर्चा झाली.

कुपोषणाने बळी गेले नाही असे उत्तर देणार्‍या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित तुम्ही चुकीचे उत्तर दिल्याबद्दल तुमच्या विरोधात हक्कभंग आणावा लागेल असा इशाराही दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिला.

कुपोषणाने बालकांचे मृत्यू होतात या प्रश्नाचे उत्तर आरोग्य विभागाने द्यायला हवे होते असे मंत्री बोलत आहेत हा आरोग्य विभागाचा प्रश्न होता तर आदिवासी विभागाने स्वीकारला का? असा सवालही दिलीप वळसे पाटील यांनी करताना आदिवासी समाजाची थोडी तरी संवेदना ठेवून काम करावे असे आदिवासी विकास मंत्र्यांना ठणकावून सांगितले.

राज्यात कुपोषणाने होणाऱ्या बालमृत्यूंच्या संदर्भात २००७ पासून एक पीआयएल कोर्टात सुरु आहे. कोर्टाच्या ऑर्डरमध्येदेखील राज्यात कुपोषणामुळे मृत्यू झालेल्या बालकांचा आकडा देण्यात आला. राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांनी या प्रश्नावर सविस्तर उत्तर देण्यासाठी हा प्रश्न राखून ठेवला होता. पण राज्यात कुपोषणाने एकही मृत्यू झालेला नाही अशी भूमिका घेणे वस्तुस्थितीला धरून नाही. आदिवासी विकास मंत्र्यांनी सभागृहात मांडलेले उत्तर मागे घ्यावे, अशी मागणीही माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभेत केली.