राज्यसभेची सहावी जागा आम्हीच जिंकू; रामदास आठवलेंनी व्यक्त केला विश्वास

मुंबई – राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार बनली आहे.(rajya-sabha-elections) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली असून शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. आज सकाळी मविआचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत थेट लढत होणार आहे. यावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू असं म्हटलं आहे. महाविकास आघाडीने एक प्रस्ताव दिला होता, मात्र त्यावर निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यसभेची सहावी जागा आम्ही जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.