अमृता फडणवीस यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती ? 

तुळजापूर –  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्यावर केतकी चितळेने ( Ketki Chitale ) आक्षेपार्ह पोस्ट केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केतकीच्या पोस्टचा तीव्र शब्दात विरोध केला जातोय. इतकचं नाही तर केतकीविरोधात अनेक ठिकाणी तक्रार करण्यात  आल्या असून पुणे, कळवा, गोरेगाव, बीड आणि उस्मानाबाद या ठिकाणीही गुन्हे दाखल झालेत. या पोस्टमुळे अभिनेत्रीला अटक देखील झाली आहे.

केतकीच्या या फेसबुक पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे.  एका बाजूला राजकारणातील दिग्गज नेते या कृत्याचा निषेध नोंदवत असताना दुसऱ्या बाजूला मात्र, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार सदाभाऊ खोत ( Sadabhau Khot ) यांनी केतकी चितळे हिचे समर्थन केलंय.

सदाभाऊ खोत यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीचे ( Tulja Bhavani Mandir ) दर्शन घेतलं. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, चंद्रकात पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टिका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं, असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला.

केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे", असं सदाभाऊ खोत म्हणाले.