मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही- बावनकुळे

Chandrashekhar Bawankule: विरोधकांच्या इन्डीया आघाडीने (India Alliance) देशातील काही नामांकित पत्रकारांवर बहिष्कार टाकणे हे त्यांच्या हुकुमशाही व राजेशाही वृत्तीचे प्रतिक असून याचा कितीही निषेध केला तरी तो कमीच असेल, अशी टिप्पणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. जनता त्याच्या या प्रवृत्तीला नक्कीच उत्तर देईल, असे ते म्हणाले.

ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. श्री बावनकुळे म्हणाले, आणीबाणीच्या काळातही असेच झाले होते. पत्रकारितेवर बंधने लावणे हे लोकशाहीला न मानण्यासारखे आहे.

• मराठवाड्याचा बॅकलॉग भरून निघणार
राज्य मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्यात झाली याबद्दल त्यांनी सरकारचे अभिनंदन केले, हा आनंदाचा दिवस असून यामुळे मराठवाड्याचा बॅकलॉक कमी होण्याची सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे सरकारने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राची वैधानिक महामंडळे बंद करून अन्याय केला. जेव्हा जेव्हा भाजपातर सरकारे आली त्या प्रत्येकवेळी विकास थांबला. लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून तेढ निर्माण केली. मतासाठी राजकारणात तुष्टीकरण केले. विकास हा विरोधकांच्या डायरीत नाही. विकासाची डायरी मोदीजींकडे आहे.

• ओबीसींचे आरक्षण कमी होणार नाही
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी संविधान चौकात सुरू असलेल्या सर्व शाखीय कुणबी ओबीसी कृती समितीच्या धरणे आंदोलनाला भेट दिली. आंदोलकांच्या विविध मागण्यांवर चर्चा केली. सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार असली तरी ओबीसींचे आरक्षण शून्य टक्केही कमी होणार नाही, याविषयी सर्वपक्षीय बैठकीत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी आंदोलकांना दिली. ओबीसी समाजाच्या मागे केंद्र व राज्य सरकारसह संपूर्ण भाजपा उभी असल्याचेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-