शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ७३ कोटी ६० लाख रुपये नुकसान भरपाई

पुणे: पुणे जिल्ह्यात गतवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे शेतीपिके व फळपिकांचे नुकसान झाले होते. त्यामध्ये ३३ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या ८५ हजार ४४५ शेतकऱ्यांना ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाई ऑनलाईन पद्धतीने करण्याची कार्यवाही सुरू असून सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी दिली आहे.

माहे सप्टेंबर ते माहे ऑक्टोबर २०२२ मध्ये नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे बाधित गावे, शेतकरी, बाधित क्षेत्र व नुकसान भरपाई पुढीलप्रमाणे. भोर तालुका – बाधित गावे ७८, शेतकरी ५२३, बाधित क्षेत्र १६५.६६ हेक्टर, नुकसान भरपाई – २३ लाख १० हजार.

वेल्हा तालुका- बाधित गावे २, शेतकरी ११, क्षेत्र १.२१ हेक्टर, नुकसान भरपाई- ३९ हजार रुपये,
मावळ – बाधित गावे ७, शेतकरी ११४, क्षेत्र २४ हेक्टर, नुकसान भरपाई- ३ लाख २६ हजार.

हवेली- बाधित गावे १०४, शेतकरी ७ हजार ४९०, क्षेत्र ३१४६.१९ हेक्टर, नुकसान भरपाई- ८ कोटी ३३ लाख २ हजार, खेड- बाधित गावे ३४, शेतकरी १ हजार ९४७, क्षेत्र १०८१.४१ हेक्टर, नुकसान भरपाई- २ कोटी २ लाख २३ हजार रुपये.

आंबेगाव तालुका- बाधित गावे ८९, शेतकरी ९ हजार ७७९, क्षेत्र २६४६.८५ हेक्टर, नुकसान भरपाई- ४ कोटी ९६ लाख ६९ हजार, जून्नर – बाधित गावे १७६, शेतकरी २२ हजार ५९१, क्षेत्र १४ हजार ५५६.३५ हेक्टर, नुकसान भरपाई- २४ कोटी ५१ लाख ४६ हजार.

शिरूर – बाधित गावे ६७, शेतकरी ४ हजार ७३४, क्षेत्र १ हजार ९६९.५४ हेक्टर, नुकसान भरपाई ४ कोटी ५६ लाख ६६ हजार रुपये, पुरंदर- बाधित गावे १४६, शेतकरी २७ हजार ८४१, क्षेत्र ९ हजार ३३२.४० हेक्टर, नुकसान भरपाई- २१ कोटी २६ लाख ५७ हजार रुपये.

दौंड- बाधित गावे ३०, शेतकरी २ हजार ८, क्षेत्र ८१८.५७ हेक्टर, नुकसान भरपाई- २ कोटी १४ लाख ८० हजार आणि बारामती तालुका- बाधित गावे १०१, शेतकरी ८ हजार ४१७, क्षेत्र ३४८०.२८ हेक्टर, नुकसान भरपाई ५ कोटी ५२ लाख २० हजार रुपये अशी एकूण ७३ कोटी ६० लाख ३८ हजार रुपये नुकसान भरपाईची रक्कम आहे.

याव्यतिरिक्त जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्ती व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शेतीपिकाच्या नुकसानीसाठी ३ कोटी १४ लाख २१ हजार रुपये आणि शेतजमीन खरडून झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख ६४ हजार रुपये इतकी रक्कम अदा करण्यात आली आहे.

मार्चमधील अवकाळीमुळे नुकसानभरपाईसाठी ७० लाख रुपये अनुदान मागणी

पुणे जिल्ह्यात मार्च २०२३ मधील अतिवृष्टीमुळे एकूण ८४ गावातील १ हजार ४३४ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली आहे. एकूण ४०८.९४ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीपोटी ७० लाख ७० हजार रुपये अनुदान मागणी केली आहे, असेही कळविण्यात आले आहे.