‘मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचा डांबर कोणी खाल्ले?’

नागपूर – मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचे डांबर कोणी खाल्ले? याची चौकशी करा, अशी मागणी भाजपा आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. तर आवश्यक असेल तर चौकशी करु असे उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

मुंबईतील अंधेरी पूर्वच्या पुलाच्या कामाबद्दल लक्षवेधी सूचना आज विधानसभेत भाजपा आमदार सुनील राणे यांनी मांडली होती. यावर बोलताना आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील डांबरी रस्त्याच्या विषयाकडे लक्ष वेधले.
या प्रकरणी आपल्या भाषणात टीका करणारे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या संशयाचे जोरदार खंडन आशिष शेलार यांनी केले.

हा पुल धोकादायक झाला असे प्रशासन सांगते तेव्हा त्याची पुनर्बांधणी करा अशी मांगणी करणारे पत्र स्थानिक आमदार म्हणून अमित साटम यांनी दिले असेल, तर त्याची कसली चौकशी करणार? असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी चौकशीच करायची असले तर गेल्या २५ वर्षांत झालेल्या डांबरी रस्त्यांमध्ये आणि पुलांच्या डांबरीकरणाची चौकशी करा, मुंबईत गेल्या २५ वर्षांत २२ हजार कोटींचा डांबर कोणी खाल्ले? कोल्ड मिक्स आणि हाँट मिक्स याची चौकशी करा अशी आग्रही मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

दरम्यान, याची तातडीने दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी वस्तुस्थिती लक्षात घेऊन आवश्यक असेल तर चौकशी करण्यात येईल. सरकार कुणालाही टार्गेट करणार नाही तसेच कुणालाही पाठीशी घालणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.