जितेंद्र आव्हाडांच्या OBC बाबतच्या वक्तव्यावर अजित पवारांचं रोखठोक उत्तर, म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नीट आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत असून त्यावरून आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही’ असं वक्तव्य केलं आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

‘ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,’ असं जितेंद्र आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

‘ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.

यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘महाराष्ट्रात कोण काय म्हंटल त्याचे उत्तरं द्यायला मी मोकळा नाही, माझी मतं मी स्पष्टपणे सांगत असतो. त्यांनी काय म्हंटल त्याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणूक होऊच नये, त्याही घटकाला त्यांचा अधिकार मिळायला हवा. अशी आमची भूमिका आहे.’ असं अजित पवार म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते.