पवारांनी काय केलं ते सोडा, सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली? मिटकरींचा सवाल

सोलापूर- गेल्या काही दिवसांपासून माजी मंत्री सदाभाऊ खोत विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला असल्याचे दिसून येत आहे. यातच आता खासदार शरद पवार यांच्यावर खोत यांनी आज तोफ डागली आहे. शरद पवारांनी (Sharad Pawar) आयुष्यभर फक्त काड्या लावायचे काम केले. त्यांचे आडनाव आगलावे करा, अशी जहरी टीका सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली. ते सोलापूरमध्ये आले असता बोलत होते.

सदाभाऊ म्हणाले की, शरद पवार साहेब हे महान नेते आहेत. मात्र, त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीही केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले आहे. मला वाटते त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केली.

खोत यांच्या टीकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे. आमदारकी जात असल्याने सदाभाऊंची अवस्था पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. त्यामुळेच ते शरद पवारांवर टीका करत आहेत. पवार साहेबांनी काय केलं. यापेक्षा सदाभाऊंच्या बुडाला का आग लागली हे आधी शोधणं महत्त्वाचं आहे, अशी टीका अमोल मिटकरी (amol mitkari) यांनी केली आहे.

सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचं काम भाजप कसं करतंय, हे अवघ्या देशाला माहीत आहे. काश्मीर फाईलच्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केलाय. आता सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे.