प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा – मिटकरी

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजपाचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवाच्या निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लाड यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोज सकाळ झाली की भाजपच्या नेत्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत नवं बेताल वक्तव्य समोर येतं. शिवरायांच्या अपमान करणाऱ्या वक्तव्यांची भाजपने मालिकाच सुरु केली आहे. प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावलाय. प्रसाद लाड महाराष्ट्राची माफी मागा! फक्त माफी मागूनही चालणार नाही तर नाक घासून प्रायश्चित्त करा, असं मिटकरी म्हणालेत.

प्रसाद लाड यांचं वक्तव्य

“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलंय.