कोट्यवधी भारतीयांची पुन्हा निराशा! ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने फायनल जिंकत विश्वचषक उंचावला

World Cup Final: पुन्हा एकदा भारतीय संघाने कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला वनडे विश्वचषक २०२३चा अंतिम सामना भारताने ६ विकेट्सने गमावला. या दुर्देवी विजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्याचे स्वप्न भंगले. पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माचे डोळे पाणावलेले होते. तर विराट कोहली टोपीने चेहरा लपवून मैदानाबाहेर जाताना दिसला.

भारताच्या २४१ धावांच्या आव्हानांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅवीस हेडने शतक ठोकले. त्याने १२० चेंडूंत १३७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ षटकार आणि १५ चौकार मारले. तसेच मार्नस लाबुशेनने अर्धशतक (५८ धावा) झळकावले. तत्पूर्वी भारताकडून रोहित शर्मा (४७ धावा), विराट कोहली (५४ धावा) आणि केएल राहुल (६६ धावा) यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीपुढे भारताची फलंदाजी कमजोर ठरली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तर हेजलवुड आणि कमिन्सनेही २ विकेट्स काढल्या.