बच्चू कडूंच्या अडचणी वाढल्या, राज्यपालांनी दिले कारवाईचे आदेश

अकोला : अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडु यांनी अकोला जिल्हा परिषदेने शिफारसीत केलेल्या विकास कामांना डावलुन, अस्तित्वात नसलेले बोगस कामे स्वतःच्या लेटरहेडवर बनावट दस्तऐवज बनवुन शासन निधीत अफरातफर केल्याने बच्चू कडु यांच्याविरुध्द अकोला पोलीसांना तक्रार दिली. परंतु अकोला पोलीसांनी राजकीय दबावाखाली येऊन कडू विरोधात गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने न्यायालयात क्रिमीनल फेस २०७१/ २०२१ नुसार बच्चू कडू यांच्या विरोधात सी.आर.पी.सी. १५६/३ खाली अकोला न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने सदर तक्रारीत प्रथम दर्शनी तथ्य आहे असे मत नोंदविले.

परंतु बच्चू कडु लोकप्रतिनिधी असल्यामुळे त्यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याआधी राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांची नाहरकत परवानगी आवश्यक आहे असे ही न्यायालयाने आदेशीत केले आहे. त्यानुसार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ मा. राज्यपाल यांना भेटून बच्चू कडू यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती.

त्यानुसार २१ फेब्रुवारी २०२२ रोजी मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य भगतसिंहजी कोशियारी यांनी अकोला पोलीस अधिक्षक यांना बच्चू कडु यांच्या विरूध्द योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचे आदेश व मा. अकोला न्यायालय यांनी नोंदविलेले मत विचारात घेता अकोला पोलीस अधिक्षक यांनी तातडीने बच्चू कडु यांच्या विरुध्द गुन्हे दाखल करून चौकशी करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केलीय.