मंदिर, मशिदीसह निवडणुकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा – बच्चू कडू

 मुंबई –  मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.  राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.  न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान,  अनेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

यातच राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी भोंग्यांच्या राजकारणावर भाष्य करत मंदिर, मशिदीसह निवडणुकीतील राजकीय नेत्यांचेही भोंगे बंद करा अशी मागणी केली आहे. बच्चू कडू म्हणाले की, राजकीय नेत्यांचे निवडणूकीत भोंगेही बंद करा. दोन वर्षे कोरोनामुळे सर्व मंदिर,बौद्ध विहार,मशिदी मधील भोंगे बंद होते त्यावेळी फक्त रुग्णवाहिकेवरचा भोंगा सुरू होता. देशात सध्या काय परिस्थिती आहे. मूळ मुद्दे बाजूला सारून वेगळे मुद्दे मांडले जात आहे. भोंगे बंद करायचे असेल तर सर्वच भोंगे बंद केले पाहिजे. निवडणूकीत राजकीय लोकांचे भोंगे बंद करून भोंगा नावाचा शब्दच बंद करावा असं बच्चू कडूंनी म्हटलं आहे.