मलिकांच्या पत्रावर शिंदे-फडणवीस एकत्र; प्रतिक्रिया देताना म्हणाले, ‘जनहिताचा अन् लोकभावनेचा…’
Eknath Shinde: महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत (Mahayuti) घेणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
“माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. सध्या केवळ प्रकृतीच्या कारणावरून ते जामीनावर तुरुंगातून बाहेर आहेत. त्यांना कोर्टाने अद्याप निर्दोष ठरवलेले नाही. त्यामुळे, त्यांच्याविषयीची आमची पूर्वीची भूमिका अजूनही कायम आहे.” असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
“सत्ताधारी पक्षांच्या बाकावरील त्यांची उपस्थिती संकेतांना धरुन नाही. आघाडीच्या घटक पक्षांनी त्यांचा पक्ष कसा चालवावा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. परंतु महायुतीमधील सर्व घटक पक्ष देशहित व जनहिताच्या ध्येयाने एकत्र आले आहेत. त्यामुळे काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेशी शिवसेना पूर्णतः सहमतच आहे. किंबहुना ही आम्ही परस्पर सहमतीनेच ती भूमिका घेतलेली आहे”, असंही पुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
तर पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, “अजित पवार जनहिताचा आणि लोकभावनेचा आदर करूनच योग्य तो निर्णय घेतील. या विषयावरून विरोधकांनी नाकाने कांदे सोलायची गरज नाही, त्यांना तो आधिकारही नाही”, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या-
बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम