महाविकास आघाडी की भाजपला पाठींबा देणार; हितेंद्र ठाकूर म्हणाले….

मुंबई – राज्यसभेची निवडणूक आता चांगलीच रंगतदार बनली आहे.(rajya-sabha-elections) आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपून गेली असून शिवसेना आणि भाजप यांच्यापैकी कुणीही माघार घेतलेली नाही. आज सकाळी मविआचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांच्या निवासस्थानी चर्चा झाली. मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अखेर निवडणूक होणारच हे निश्चित झालं आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पहिला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचे कारण म्हणजे बहुजन विकास आघाडी राज्यसभेत भाजपला मतदान करण्याची शक्यता वर्तविली जात असताना हितेंद्र ठाकूर यांनी लक्ष्यवेधी वक्तव्य केले आहे.

बविआचे नेते हितेंद्र ठाकूर याबाबत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये 100 टक्के खूषही नाही आणि 100 टक्के नाराजही नाही. सर्व राजकीय पक्षांमध्ये माझे मित्र आहेत मला कुणीही अस्पृश्य नाही. सर्व राजकीय पक्षांच्या टॉप लिडर्सनी मला संपर्क साधला आहे. 10 तारखेला मतदाना दिवशी मी माझी भूमिका जाहीर करणार."असं ते म्हणाले.