भाजपापासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय : एच. के. पाटील

शिर्डी –  स्वातंत्र्यप्राप्तीसह मागील सत्तर वर्षात काँग्रेस पक्षाने राबवलेल्या विविध योजनांमुळे देश समृद्ध झाला आहे. मात्र सात वर्षापूर्वी सत्तेवर आलेला भाजपा हा सातत्याने खोटे बोलून देशवासियांची दिशाभूल करत आहे. जाती-धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांपासून देशाला वाचवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी-कोपरगाव रोडवरील साईसृष्टी लॉन्स येथे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा व डिजिटल आढावा बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी बी. एम. संदीप, विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, आमदार हिरामण खोसकर, आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यासह अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रभारी एच. के. पाटील म्हणाले की, काँग्रेसला मोठी परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसह स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसच्या माध्यमातून देशाची मोठी प्रगती झाली आहे. मात्र मागील सात वर्षापूर्वी आलेले भाजपाचे सरकार सातत्याने खोटे बोलत आहे. पंतप्रधान हे खोटे बोलून देश व जनतेची दिशाभूल करत आहेत. कोणतेही काम न करता फक्त जाहिरातबाजी करणाऱ्या या लोकांनी पंधरा लाख रुपये, दोन कोटी नोकऱ्याची खोटी आश्वासने दिली. या उलट देशात तीन काळे कायदे लावून शेतकरी विरोधी निर्णय घेतला.

भाजपापासून देशाला वाचवण्याकरता काँग्रेस हाच सक्षम पर्याय असून काँग्रेस हा गोरगरिबांच्या विकासाचा पक्ष आहे. डिजिटल नोंदणीच्या माध्यमातून तरुणांना यामध्ये मोठी संधी असून महाराष्ट्रातून एक कोटी डिजिटल सभासद करावे असे आवाहन त्यांनी केले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीन काळया कायद्याविरोधात राबवलेली शेतकऱ्यांची एक कोटी स्वाक्षरी मोहीम अत्यंत यशस्वी झाली होती. थोरात हे राष्ट्र बांधणी करणारे लोकाभिमुख नेतृत्व असून देशपातळीवर त्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह संपूर्ण देशामध्ये ते लोकप्रिय असल्याचेही पाटील म्हणाले