‘जीन्सवाल्या मुलींना मोदी आवडत नाहीत, 40 ते 50 वर्षाच्या महिलांवरच…’; दिग्विजयसिंह पुन्हा बरळले

भोपाळ:  वादग्रस्त वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह हे पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने चर्चेत आले आहेत. सिंह यांनी काल एक वादग्रस्त विधान केलं आहे. जीन परिधान करणाऱ्या मुलींना पंतप्रधान नरेंद्र मोदी आवडत नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलांवरच मोदींचा प्रभाव आहे, असं विधान दिग्विजय सिंह यांनी केलं आहे.

भोपाळमध्ये जन जागरण  अभियानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. जीन्स परिधान करणाऱ्या आणि मोबाईल बाळगणाऱ्या मुली मोदींमुळे प्रभावित नाहीत. केवळ 40 ते 50 वयोगटातील महिलाच मोदींवर प्रभावित आहेत, असं  ते म्हणाले आहेत.

2024मध्ये मोदी पुन्हा विजयी झाल्यास सर्वात आधी देशाचं संविधान बदललं जाईल. जे काही आरक्षण मिळतंय तेही बंद केलं जाईल. कारण भाजप रशिया आणि चीनचं मॉडल फॉलो करत आहेत, असा दावा दिग्विजय सिंह यांनी केला.दिग्विजय सिंह यांच्या या वादग्रस्त विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशच्या भाजप सरकारवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले,मध्य प्रदेशात बजरंग दलाचे सर्वाधिक गुंड आहेत. पोलिस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली. तुम्ही खून करणाऱ्याला नोकरी दिली. त्यांनी आरोप केला की, भाजप बजरंग दलाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मोदींचे सरकार आहे. शिवराज मामू यांच्याकडे वाळू माफिया टोळी आहे, आता त्यांच्याविरुद्ध लढा द्यावा लागेल, असे ते म्हणाले.