ज्या माणसाने आयुष्यभर संविधान वाचावे म्हणून प्रयत्न केले त्यावर तुम्ही आरोप करता काय? – आव्हाड

पक्षविरोधी कारवाया लक्षात आल्यावर पक्षाबाहेर काढण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो...

मुंबई   – पवारसाहेबांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नेमणूक केली त्यात प्रफुल पटेल हे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत. तुम्हाला जो सहयांचा अधिकार दिला तो शरद पवार यांनी मग त्यांचे अधिकार अमान्य का करता? पक्षच तुमचा आहे, सगळेच तुमचे आहे तर फेरनिवड कशाला करता ? राष्ट्रीय निवडणूक समिती आहे त्यांना न सांगता तुम्ही पक्षाध्यक्षांची निवड कशी करु शकता असे अनेक सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्लाबोल पत्रकार परिषदेत केला.

आम्हीच नेमणूक केली आहे असे ते सांगत असतील तर तुम्ही नेमणूक केली नाही हे आमचं म्हणणंच नाही. आमच्याकडे त्याबाबतचे पत्र आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. खासदार, आमदारांच्या पक्षविरोधी कारवाया लक्षात आल्यावर पक्षाबाहेर काढण्याचा अधिकार हा अध्यक्षांना असतो. त्याचा वापर हा वर्कींग कमिटीला करता येतो. तो कालच्या बैठकीत करण्यात आलेला आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

१५ सप्टेंबर २०१७ चे पत्र दाखवतानाच शरद पवार यांना कोणताच अधिकार नाही म्हणता मग तुम्हालाही अधिकार नाही. तुमची नेमणूकच त्यांच्या अधिकारात झाली आहे असे ठणकावतानच संविधानाला मानणारे आणि संसदेत काम करणार्‍या एनजीओंच्या लक्षात आले पक्षातरांचा वापर करून सत्तेमध्ये मोठी हेराफेरी होते तेव्हा यावर कुठेतरी आळा घातला पाहिजे म्हणून १९८५ साली ५२ वी घटनादुरुस्ती झाली. त्यातून दहावे शेड्युल जन्माला आले. ४० आमदारांनी व्हीप लागू झाला तर ती आई आणि मुलाची नाळ असते. पक्षाचा वापर फक्त निवडणूक एबी फॉर्म मिळवण्यासाठी, निधी मिळविण्यासाठी नेतृत्वाच्या वलयाचा वापर करून निवडून येत असतात आणि मग अचानक सांगायचे आम्ही चाललो हे योग्य नाही.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी दहावं शेड्युल कशासाठी तर हे सगळे रोखण्यासाठी आहे असे सांगितले आहे. तेव्हा कुणालाही आपल्या आईची नाळ तोडून बाहेर जाता येणार नाही. हे स्पष्ट केले आहे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तुमच्याकडे दोन तृतीयांश लोक आहेत तर मर्ज करा. तुम्हाला भाजपचे दरवाजे उघडे आहेत की? तुम्ही ३० जूनला बैठक झाली सांगतात मग त्यातील लोक कुठे कुठे होते हे तरी माहीत आहे का? बैठक कुणाच्या नेतृत्वाखाली झाली. ३ जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत किटी पार्टीने बैठक कधी आणि किती वाजता घेतली. निवडणूक आयोगाला कधी कळवले इतका उशीर का लागला कळवायला. याचे पुरावे काय आहेत असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

शरद पवार हेच आमचे अध्यक्ष आहेत त्यांना राष्ट्रीय मान्यता आहे. निवडणूक आयोगाची मान्यता आहे. आमच्या वर्कींग कमिटीच्या बैठकीला २४ राज्याच्या प्रदेशाध्यक्षांनी पवारसाहेबांना पाठिंबा दिला आहे हेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

ज्या राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला, वाढले.ज्यांनी या भूमीला संविधान दिले त्यांची ही भूमी आहे .या भूमीची माती न्याय शिकवते त्यामुळे न्यायाच्या पाट्या उलट्या पालटया करताना शब्दार्थ बदलणार नाही याचीतरी काळजी घ्या असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

या संविधानाच्या आधारावरच त्यांना अनेक पदे मिळाली. फायदे कसे घेतले. पक्षाने सर्व दिले ते कुणामुळे मिळाले. ७० सालापासून कुणाचे वलय आहे त्यांचे नाव शरद पवार आहे. संविधान चुकीचे आहे म्हणणे हा निवडणूक आयोगाचा अपमान आहे. माझा व्यक्तिगत स्वार्थ नाही माझी लढाई पक्षासाठी, संविधानासाठी आहे. माझ्या पक्षावर चुकीचा आरोप कुणी करेल त्या – त्यावेळी मी उभा राहणार आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी ठणकावून सांगितले. ज्या माणसाने आयुष्यभर संविधान वाचावे म्हणून प्रयत्न केले त्यावर तुम्ही आरोप करता काय? असा संतप्त सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.