कॉंग्रेसचा विजय सहानुभूतीमुळे, 2024 सालच्या निवडणुकीत ही जागा भाजपच जिंकणार – फडणवीस

मुंबई – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. काँग्रेसच्या जयश्री जाधव (Jayashree jadhav) यांनी भाजपचे सत्यजित कदम (Satyjeet kadam)  यांचा 18,901 मतांनी पराभव केला आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाण्याचा मान काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना मिळाला आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये (Kolhapur) आमदारकीचं खातं उघडण्याचं भाजपचं स्वप्न अधुरं राहिलं.एकूण 26 फेऱ्यांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. जयश्री जाधव पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या. मधल्या काही फेऱ्या वगळता त्यांनी आपली आघाडी कायम राखली. अखेर त्यांचा मोठा मताधिक्याने विजय झाला.

दरम्यान,  कोल्हापुरातील काँग्रेसचा विजय हा केवळ सहानुभूतीमुळे मिळाला आहे, त्यामुळे 2024 सालच्या निवडणुकीत ही जागा भाजपच जिंकणार असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. नेशन टू सेव्ह या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले होते, त्यावेळी ते बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा पहिल्या दिवसांपासून आपला बेस वाढवतोय. भाजप-शिवसेना एकत्र असताना जेवढी मतं मिळत होती त्यापेक्षा जास्त मतं ही भाजपला मिळाली आहेत. तीन पक्ष एकत्रित असतानाही भाजपला जास्त फायदा झाला आहे. काँग्रेसचा विजय हा सहानुभूतीमुळे झाला आहे. त्यामुळे 2024 साली या जागेवर भाजपचाच उमेदवार जिंकणार हा माझा विश्वास आहे.