नवी वॉर्ड रचना रद्द, 2017 च्या वॉर्डरचनेप्रमाणेच निवडणुका होणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, या निर्णयासोबत मविआ सरकारच्या काळात वाढवलेली वॉर्डरचना रद्द करण्यात आली असून यामध्ये मुंबईतील वाढलेल्या 9 वॉर्डचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला आहे. हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचं सांगितलं जातंय.

मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वॉर्ड रचना रद्द करुन ती 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती त्या प्रमाणे कायम ठेवण्यात येणार आहे. राज्यातील येत्या निवडणुका या जुन्याच वॉर्ड रचनेप्रमाणे घेण्यात येणार आहेत.