महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पारदर्शक : प्राजक्त तनपुरे

अहमदनगर : महावितरण कंपनीची विद्युत सहायक पद भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक करण्यात आली असून कागदपत्रांची तपासणी काटेकोरपणे करण्यात येणार येणार आहे. ज्या उमेदवारांनी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरला असेल त्यांना नियमानुसार अपात्र घोषित करण्यात येईल, कोणत्याही उमेदवारांवर अन्याय होणार नाही असा प्रकारे संपुर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जाईल असे मत उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

एच एस बी सी, फोर्ट येथील एमएसईबी सूत्रधार कंपनीच्या इमारतीमध्ये राज्यातील निवडक विद्युत सहायक उमेदवारांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी (ता. ०४) बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्त्तरे देवून ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारांचे समाधान केले. त्यानंतर उमेदवारांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना पुष्पगुच्छ देवून आभार मानले.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल पारदर्शकपणे जाहीर करण्यात आला आहे. या निकालाबाबत माध्यमांतून आणि समाजमाध्यमातून चुकीच्या पद्धतीने प्रसार करण्यात येत होते. याकरिता राज्यातील विविध भागातून विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले आणि या निकालावर शंका असलेल्या उमेदवारांना बोलावून त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले आहे. निकालात कसल्याही प्रकारची चुक झाली नसल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.

सर्व निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये कट ऑफ, राखीव जागा, आरक्षण, गुणांकन आदी बाबी स्पष्ट होतील. त्यानंतर कोणाचीही शंका राहणार नाही. भरती प्रक्रिया लवकर पुर्ण करण्यासाठी कागदपत्रे तपासणी करून नियुक्ती पत्रेही देण्यात येणार आहेत. संपूर्ण भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे. सर्व उमेदवारांना न्याय मिळणार आहे. कोणीही कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी केले. यावेळी महावितरण कंपनीचे अधिकारी आणि उमेदवारांच्या शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हे ही पहा: