सामाजिक न्याय विभागाकडील चारही महामंडळांच्या भागभांडवल वाढीचा शासन निर्णय जाहीर

मुंबई – २८ एप्रिल रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मांडलेल्या प्रस्तावानुसार विभागाच्या अखत्यारीत असलेल्या ४ महामंडळाचे भागभांडवल वाढवण्याचा निर्णय झाला (Government decides to increase the share capital) होता. त्याची अंमलबजावणी होत असून, राज्यशासनाने याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित केला आहे.

या शासन निर्णयानुसार महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे भागभांडवल पूर्वी ५०० कोटी होते, ते वाढवून एक हजार कोटी करण्यात आले आहे. त्याचबरोबर संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे भागभांडवल ७३ कोटींवरून वाढवून एक हजार कोटी, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे भागभांडवल ३०० कोटींवरून वाढवून एक हजार कोटी आणि राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल ५० कोटींवरून दहा पटीने वाढवून ५०० कोटी करण्यात आले आहे. सामाजिक न्याय विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय आज जाहीर केला आहे.

संबंधित महामंडळाच्या भागभांडवल वाढीसाठी आमच्या विनंतीवरून राज्यसरकारने भरभरून निधी दिला असून. अतिरिक्त निधी टप्याटप्याने महामंडळांना वितरित करण्यात येईल. या महामंडळांच्या माध्यमातून राज्यातील प्रत्यक्ष लाभ मिळणाऱ्या गरजू लाभार्थींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून, त्यांना थेट लाभ मिळाल्याने त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार असल्याचा विशेष आनंद असल्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांसह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.