‘हे माझे भाग्य आहे की मला पुणे मेट्रोच्या पायाभरणीची आणि आता उद्घाटन करण्याचीही संधी मिळाली’

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन केले तसेच  पुण्यातील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार प्रकाश जावडेकर यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी स्वातंत्र्यलढ्यात पुण्याने दिलेल्या  योगदानाची आठवण  करून देताना लोकमान्य टिळक, चाफेकर बंधू , गोपाळ गणेश आगरकर, सेनापती बापट, गोपाळ कृष्ण देशमुख, आर जी भांडारकर आणि महादेव गोविंद रानडे या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. त्यांनी रामभाऊ म्हाळगी,  बाबासाहेब पुरंदरे यांनाही वंदन  केले.तत्पूर्वी पंतप्रधानांनी पुणे महानगरपालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या  पुतळ्याचे अनावरण केले आणि शिवाजी महाराजांना अभिवादन केले.  आपल्या सर्वांच्या  हृदयात वसलेले  शिवाजी महाराज यांचा हा पुतळा तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना  जागृत करेल, असे ते म्हणाले.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले,“हे माझे भाग्य आहे की तुम्ही मला पुणे मेट्रोच्या पायाभरणीसाठी आमंत्रित केले होते आणि आता तुम्ही मला त्याचे उद्घाटन करण्याची देखील संधी दिली आहे. प्रकल्प  वेळेवर पूर्ण होऊ शकतात हा संदेशही यात आहे.  मोदी पुढे म्हणाले की ,“शिक्षण, संशोधन आणि विकास, माहिती तंत्रज्ञान  आणि वाहन निर्मिती  क्षेत्रातही पुण्याने सातत्याने आपली ओळख मजबूत केली आहे. अशा परिस्थितीत आधुनिक  सुविधा ही पुणेकरांची गरज आहे आणि आमचे सरकार पुण्यातील लोकांची ही गरज लक्षात घेऊन काम करत आहे.2014 पर्यंत मोजक्याच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती, आज देशातील दोन डझनहून अधिक शहरे मेट्रो सेवेचा लाभ घेत आहेत किंवा काही शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध होण्याचा मार्गावर आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

यात मुंबई, ठाणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवड, पुणे या शहरांमधील मेट्रो सेवा पाहिल्यास, मेट्रो  रेल्वे सेवेच्या  या विस्तारात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, असे त्यांनी सांगितले.ही मेट्रो सेवा पुण्यातील वाहतूक / प्रवास   सुलभ करेल, प्रदूषण आणि वाहतूक कोंडीपासून   दिलासा देईल त्याचप्रमाणे  पुण्यातील नागरिकांच्या जगण्यातील सुलभता वाढवेल, असा विश्वास  पंतप्रधान व्यक्त केला. मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक वापरण्याची सवय पुण्यातील विशेषत: सुखवस्तू  नागरिकांनी  अंगी बाणवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वाढती शहरी लोकसंख्या ही संधी आणि आव्हान दोन्ही आहे. आपल्या शहरांमधील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्याच्या प्रश्नाचे, सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा विकास  हे मुख्य उत्तर आहे, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील वाढत्या शहरीकरणाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून , सरकार अधिकाधिक हरित वाहतूक, इलेक्ट्रिक बसेस, इलेक्ट्रिक मोटार  आणि इलेक्ट्रिक दुचाकी त्याचप्रमाणे  प्रत्येक शहरात अत्याधुनिक  वाहतूक सुविधा, सार्वजनिक वाहतुकीच्या सर्व  सुविधांसाठी नागरिकांना  एकच कार्ड प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे ,अशा प्रकारच्या उपक्रमांची पंतप्रधानांनी  यादी सांगितली. सुविधा अत्याधुनिक  करण्यासाठी प्रत्येक शहरात एकात्मिक कमांड आणि कंट्रोल केंद्र  असावे. चक्रीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी प्रत्येक शहरात आधुनिक कचरा व्यवस्थापन यंत्रणा असायला हवी.प्रत्येक शहराला अतिरिक्त पाणी मिळावे या अनुषंगाने  पुरेसे आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असावेत तसेच जलस्रोतांच्या संवर्धनासाठी चांगली व्यवस्था केली पाहिजे,  या गरजांवर पंतप्रधानांनी भर दिला. कचऱ्यापासून संपत्ती निर्माण करण्यासाठी अशा शहरांमध्ये  गोबरधन आणि बायोगॅस प्रकल्प असावेत , एलईडी  बल्बचा वापर यांसारखे ऊर्जा कार्यक्षम उपाय हे या शहरांचे वैशिष्ट्य असले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अमृत अभियान आणि रेरा कायदे ,शहरी परिदृश्यामध्ये नवीन सामर्थ्य  आणत आहेत, असे ते म्हणाले.