कृष्णा नदी कोरडी पडली आहे, कोयना धरणाचे पाणी नदीत सोडा; जयंत पाटील यांची विधानसभेत मागणी

Jayant Patil :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज कोयना धरणाच्या पाण्याचा मुद्दा सभागृहात लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. यावेळी सांगली जिल्ह्य़ातील भीषण पाणीटंचाईवर सभागृहाचे लक्ष वेधत असताना कोयना धरणाचे पाणी लवकरात लवकर कृष्णा नदीत सोडण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली.

याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, कोयनेतून पाणी कमी आल्याने कृष्णा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे तकारी आणि अन्य उपसा सिंचन योजनेचे पंप बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्याचे हक्काचे ३२ टीएमसी पाणी उपलब्ध करून देणे व कृष्णा नदी कोरडी न पडू देणे याची काळजी शासनाने घेतली पाहिजे.

जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी विविध विधाने करत आहेत. खासदार महोदयांनी तर राजीनामा देतो असे विधान केले. या विविध विधानांमुळे, राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही असा समज झाला. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पालकमंत्र्यांचे समन्वय नाही किंवा संवाद नाही असे दिसून आले आहे असे म्हणत त्यांनी कोयना धरणाच्या पाण्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर टोला लगावला.

२ आणि ३ टीएमसी पाण्यासाठी ३२ टीएमसी पाण्यावर अन्याय करणे योग्य नाही. धरणात पाणीच नाही अशी परिस्थिती नाही. ताकारी, टेंभू, म्हैसाळ योजनेतून या खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत या भागात पाणी जातं. या काळात पाणी दिले तर उन्हाळ्यात त्रास होत नाही. पाणी सोडले तर या दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. तसेच कृष्णा नदीत पाणीसाठा राहील असे सांगत असतानाच एप्रिल – मे मध्ये आमच्या जिल्ह्यात पाण्याचा प्रचंड ताण येतो. याच काळात कोकणात वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले जाते. वीजनिर्मिती थोडीशी कमी करून पाणी जिल्ह्याला डायव्हर्ट करावे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

दरम्यान त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

महत्वाच्या बातम्या-