संपुर्ण महाराष्ट्रातील ५० अनाथ मुलांचे स्वनाथ फाउंडेशन घेणार प्रतिपालकत्व – मंगलप्रभात लोढा

मुंबई : राज्यातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना त्यांचे हक्काचे क्षण, प्रेम, काळजी, शिक्षण आणि सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन (Swanath Foundation) मुंबईने राज्यातील ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दिली.

मंत्रालयातील दालनात महिला व बालविकास विभाग आणि स्वनाथ फाउंडेशन यांच्यात ५० बालकांचे प्रतिपालकत्व घेण्याबाबत सामंजस्य करार पार पडला त्यावेळी महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, महिला व बालविकास कोकण विभागाचे उपायुक्त राहुल मोरे, मुंबई (Mumbai) येथील स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय, विश्वस्त गगन महोत्रा, सारिका पन्हाळकर उपस्थित होते.

लोढा म्हणाले, बालसुधारगृह अथवा महिलासुधारगृहामध्ये जी मुले – मुली राहतात ती १८ वर्ष पुर्ण झाल्यानंतर त्यांना राहयाचा प्रश्न उभा राहतो यासाठी प्रतिपालकत्व घेण्यासाठी स्वनाथ फाउंडेशन ने शासनासोबत येवून ५० मुलांना प्रतिपालकत्व घेण्याचा निर्णय अत्यंत स्तुत्य आहे तरी अशा प्रकारे सामाजिक उपक्रम राबविणा-या संस्थांनी पुढे यावे असे आवाहन मंत्री लोढा यांनी केले.

प्रतिपालकत्व घेण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे

महिला व बालविकास आयुक्त आर.विमला म्हणाल्या, राज्यातील काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना दत्तक दिले जाते तसेच प्रतिपालकत्व देखील दिले जाते. यामध्ये या बालकांना घरी आणून त्यांना घरचे सुरक्षित वातावरण मिळावे व प्रेम मिळावे त्यांच्या शैक्षणिक आणि कौशल्ययुक्त गरजा पूर्ण करून सक्षम बनविण्यासाठी मदत मिळू शकते असेही महिला व बालविकास आयुक्त आर.विमला म्हणाल्या.

दत्तक न घेतलेल्या मुलांचे प्रतिपालकत्व संस्था घेणार : श्रेया भारतीय

स्वनाथ फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तथा संस्थापक श्रेया भारतीय म्हणाल्या,जी मुले ६ ते १८ वर्षांची आहेत आणि काही कारणास्तव दत्तक नाहीत अशी बालसुधारगृह अथवा महिलासुधारगृहामधील मुले संस्था प्रतिपालकत्व घेणार आहे.या मुलांचे बालपण सुखकर जावे,अनाथमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आमची संस्था काम करत आहे. महिला व बालविकास विभागाच्या मदतीने आम्हाला या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळत आहे असेही त्या यावेळी म्हणाल्या.