“त्यांना ‘शिंदे सेना’ म्हणण्याऐवजी…”; शिंदेंच्या बंडखोरीनंतर नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोर झाल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार संकटात सापडले आहे. शिंदे यांची बंडखोर वृत्ती पाहता शिवसेनेने त्यांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरून हटवले असले तरी या निर्णयांमुळे एकनाथ शिंदे हे कोणत्याही दबावाखाली दिसत नाहीत.

गुवाहाटी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुरुवारी एकनाथ शिंदे यांची नेता म्हणून निवड केली. यासोबतच विरोधी विचारसरणीच्या पक्षांशी युती केल्यामुळे गेल्या अडीच वर्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना केडरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप बंडखोर आमदारांनी केला. या सर्व कारणांमुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. दरम्यान, आमदारांसोबतच आता खासदारही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनार्थ येताना दिसत आहेत.

दरम्यान, भाजपाचे नेते नितेश राणे यांनी एकनाथ शिंदेंच्या गटाला शिंदे सेना म्हणणाऱ्या प्रसारमाध्यमांवर आक्षेप घेतला आहे. नितेश राणे यांनी आपली ही नाराजी ट्विटरवरुन बोलून दाखवली असून उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या आमदारांची संख्या पाहता त्यांनाच ‘उद्धव सेना’ म्हटलं पाहिजे असा खोचक टोलाही नितेश यांनी लगावलाय.

ते म्हणाले,  मला आश्चर्य वाटत आहे की प्रसारमाध्यमांमधील मित्र या गटाला शिंदे सेना का म्हणत आहेत? शिवसेना ही माननिय बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंतांची असून ते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे ती खरी शिवसेना आहे. याचनुसार दुसऱ्या बाजूला उद्धव सेना म्हटलं पाहिजे, असं ट्विट नितेश यांनी केलंय.