केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा ?

मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणेंना जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्यात ( Narayan Rane Adhish Bunglow ) बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी पालिकेने (BMC) त्यांना नोटीस दिली होती. त्यावर उच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर राणेंना आपले म्हणणे मांडायला संधी दिली होती. राणेंनी आपले बांधकाम नियमित करण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. मात्र, हा अर्ज पालिकेच्या के पश्चिम विभागाने फेटाळला आहे. यामुळे राणेंच्या अडचणीत वाढ झाली असून, बेकायदेशीर बांधकामावर (Illegal construction) हातोडा पडण्याची शक्यता वर्तवली जात ( Construction Regularity Application Rejected Bmc ) आहे.

मुंबई महापालिकेने बांधकाम नियमिततेची कागदपत्रं पुन्हा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली आहे. १५ दिवसांमध्ये योग्य कागदपत्रं सादर झाली नाही तर महापालिका कारवाई करणार आहे. 21 फेब्रुवारीला नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली होती.

दरम्यान,  नारायण राणे यांच्या बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेला मिळाली होती. त्यानंतर महापालिकेच्या इमारत प्रस्ताव आणि इमारत बांधकाम विभागाच्या पथकाने या बंगल्याची दोन तास पाहणी केली होती.