अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार – नाना पटोले

मुंबई – आपला देश कृषीप्रधान आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा महत्वाचा आहे पण शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. जीडीपी (GDP) घरसत असताना तो सावरण्याएवेजी डीपी बदलण्याचे आवाहन केले जात आहे. जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये यासाठी तसेच बळीराजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बोलताना सर्वांनी ‘जय बळीराजा’ म्हणा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)   यांनी केले आहे.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, वंदे मातरम् बद्दल आम्हाला आक्षेप असण्याचे कारण नाही, आम्हाला त्याचा अभिमानच आहे पण त्यासाठी कोणावर जबरदस्ती करता येणार नाही. शेतकरी आपल्या देशाच्या कणा आहे त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. महत्वाचे विषय दुसरीकडे वळवण्यासाठी धर्माच्या आधारावर काही मुद्दे पुढे केले जात असतील तर ते बरोबर नाही. आपल्या देशाचा अन्नदाता असुरक्षित व दुर्लक्षित आहे, जीडीपी शेतीवरच आधारीत आहे जीड़ीपी ऐवजी डीपी बदल्यास सांगितले जाते म्हणूनच आम्ही बोलताना सर्वांनी बळीराजाची आठवण रहावी म्हणून जय बळीराजा बोलावे अशी भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत, अतिवृष्टीने राज्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे पण अजून पंचनामे झालेले नाहीत. राज्य सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे, हेक्टरी ७५ हजार रुपये द्यावेत ही आमची मागणी आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरू व शेतकऱ्याला भरीव तसेच तातडीने मदत देण्यास राज्य सरकारला भाग पाडू. काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला पण राज्यातील सरकार हे मात्र शेतकरी विरोधी आहे.

स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी लाल किल्यावरून देशाला संबोधीत केले पण महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार, देशातील ज्वलंत प्रश्न यावर ते एक शब्दही बोलले नाहीत. पंतप्रधान महागाईमधील ‘म’ सुद्धा बोलले नाहीत. पंतप्रधान दीड तास तेच तेच बोलत होते पण सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांची दखलही घेतली नाही हे दुर्दैवी आहे, असे पटोले म्हणाले.