नारायण पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली विकासकामांसाठी निधीची मागणी

मुंबई – माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करमाळा मतदार संघातील विविध कामांसाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली असून यात वीज, रस्ते, आरोग्य, तीर्थक्षेत्र आदि बांबींचा समावेश आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या समोर पाटील यांनी मतदार संघातील समस्या मांडून निधी मिळावा म्हणून आग्रही मागणी केली असल्याचे समजते. यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून आगामी काळात या कामांसाठी निधीची पुर्तता केली जाणार असल्याचे सांगितले गेले.

भगिरथ मधून पुढील गावांना 100 केव्हीए चे डिपी बसवून मिळावेत म्हणून मागणी केली यात जेऊर, वाशिंबे, लव्हे, सालसे, पोमलवाडी, हूलगेवाडी, उमरड, चिखलठाण, केम, कंदर, साडे, राजूरी, झरे, केतूर, कुंभारगाव, पोथरे, जिंती, वीट, करंजे आदिसह काही इतर गावांचाही समावेश आहे. तसेच केम ता करमाळा येथील श्री उत्तरेश्वर मंदिरास ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा म्हणून मागणी केली असून सद्या हे देवस्थान क वर्गात असल्याने जास्त प्रमाणात निधी मिळत नव्हता. वीज टंचाई दुर करण्यासाठी कविटगाव, वाशिंबे, केम, जातेगाव, राजूरी या ठिकाणच्या सबस्टेशन मध्ये 5 एम व्ही चे वाढीव ट्रान्सफॉर्मर बसवले जावेत अशी मागणी केली आहे.जनावरांच्या दवाखान्यांत सुधारणा व्हावी म्हणून कोर्टी, पांगरे, जिंती व केम येथील पशुवैद्यकीय केंद्रास श्रेणी 2 मधून 1 मधे रुपांतर करण्यात यावे अशी मागणी केली आहे.यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांच्या समवेत वाशिंबे येथील आदिनाथचे माजी संचालक नवनाथ झोळ होते.