ईडी कधी घरावर छापा टाकतेय याची पुष्पगुच्छ घेऊन वाट बघतोय – मलिक

मुंबई  – काही दिवसापासून ईडीच्या कार्यालयातून पत्रकारांना नवाब मलिक यांच्या घरावर छापा पडणार आहे अशा बातम्या पेरण्यात येत आहेत. त्यांनी बातम्या पेरून बदनामीचा उद्योग बंद करावा. काही असेल तर रितसर प्रेस नोट काढा आणि त्या बातम्यांची जबाबदारी स्वीकारा.भाजपच्या अजेंड्यावर आम्हाला बदनाम करण्याचा उद्योग ईडीने बंद करावा असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.

किरीट सोमय्या हे नवाब मलिक यांना अटक होणार आहे असे सांगत आहेत. सोमय्या तुम्ही ईडीचे प्रवक्ते झाल्याचे नियुक्तीपत्र घ्या. ईडीलाही एका चांगल्या प्रवक्त्याची गरज आहे. सोमय्यांना निदान पगार तरी सुरु होईल असा खोचक टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

खासदार असताना बोगस बिलांद्वारे पैसे उकळले, त्याचीही माहिती मी येणाऱ्या काळात बाहेर काढणार आहे. सोमय्यांना ईडीचा प्रवक्ता घोषित केले पाहिजे. मी दररोज सकाळी दरवाज्यात पुष्पगुच्छ घेऊन ईडीच्या अधिकाऱ्यांची वाट पाहत असतो. यापुढेही आले तर त्यांचे स्वागतच करु. परंतु ज्यापद्धतीने ईडीच्या अधिकाऱ्यांनी वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर सात ठिकाणी छापा मारला अशा बातम्या पेरल्या होत्या. त्याच उत्तर त्याचदिवशी दिलेले होते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

आमच्या एका अधिकाऱ्याला ईडीचे अधिकारी दोन दिवस बोलावून तुम्ही एण्डोमेंट बोर्डाचा चुकीचा एफआयआर दाखल केलात काय गरज होती अशी विचारणा करत आहेत. एफआयआर दाखल झाल्यावर भाजपच्या सांगण्यावरून मला शोधण्यासाठी गेला होतात याची आठवणही ईडीला करुन देताना आता काय सापडत नाही म्हटल्यावर एफआयआर चुकीचा आहे सांगत आहात असेही नवाब मलिक म्हणाले.

तुम्हाला जी काही कारवाई करायची ती करा पण बातमी पेरण्याचे काम बंद करा असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे. ईडीने ऑफिशियल बातमी दिली पाहिजे. वक्फ बोर्डाबाबत कोणती केस नोंदविण्यात आली? त्यात काय प्रगती झाली? त्यात कोण आरोपी होऊ शकतात? याची रितसर माहिती द्या असे पत्राद्वारे विचारणा करणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.

सोमय्या तुम्ही मी वक्फ बोर्डाची जमिन हडप केली असे सांगत आहात. मी जमीन हडप केलेली नाही. मात्र आगामी काळात पुण्यातील दोन एफआयआरमध्ये वक्फची जमिन हडप केल्याप्रकरणी भाजपच्या दोन नेत्यांवर एफआयआर दाखल होणार आहे. त्यांना लवकरच अटक होईलच मात्र राज्यातील वक्फ बोर्डाच्या जमीनी भाजप नेत्यांनी लाटल्या आहेत त्यांना सोडणार नाही असा स्पष्ट इशाराही नवाब मलिक यांनी देताना आता या नेत्याना ईडी बोलावते का हे पाहणार असे सूचक विधान नवाब मलिक यांनी केले आहे.