‘माझ्या मुलांना ४५ दिवसांपासून बंधक बनवलंय’, पत्नी आलियाच्या आरोपांवर नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडले मौन

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची पत्नी आलिया सिद्दीकी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. आलिया (Aaliya Siddiqui) आणि नवाजुद्दीन (Nawazuddin Siddiqui) यांना दोन मुले आहेत – एक मुलगा यानी आणि एक मुलगी शोरा. आलियाने नवाजुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी, आलिया सिद्दीकीने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात दावा केला होता की तिला आणि तिच्या मुलांना अभिनेत्याच्या घरातून बाहेर काढण्यात आले आहे. आता, नवाजुद्दीनने भलीमोठी पोस्ट लिहित या प्रकरणावर मौन सोडले आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीने एक निवेदन जारी करून आलिया सिद्दीकीच्या आरोपांवर खुलासा केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘माझ्या मौनामुळे मला सर्वत्र वाईट माणूस म्हटले जात आहे. मी गप्प आहे कारण कुठेतरी माझी लहान मुलं हे संपूर्ण नाटक वाचतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, प्रेस आणि बरेच लोक एकतर्फी आणि हाताळलेल्या व्हिडिओच्या आधारे माझ्या चारित्र्य हत्येचा आनंद घेत आहेत.’

नवाजुद्दीन म्हणाला की त्याला काही मुद्दे स्पष्ट करायचे आहेत, पहिली गोष्ट म्हणजे तो आणि आलिया अनेक वर्षांपासून एकत्र राहत नाहीत. नवाजुद्दीन सिद्दीकीने असा दावा केला आहे की, त्याचा आणि आलियाचा घटस्फोट झाला आहे आणि तो फक्त आपल्या मुलांसाठी नाते सांभाळत आहे. नवाजुद्दीनने पुढे दावा केला की, आलियाने शोरा आणि यानी यांना गेल्या ४ महिन्यांपासून दुबईत सोडले होते आणि पैशाच्या मागणीच्या बहाण्याने त्यांना मुंबईत बोलावले आहे. मुलांसह दुबईला जाण्यापूर्वी शाळेची फी, वैद्यकीय, प्रवास आणि इतर सुट्ट्या वगळता आलियाला गेल्या २ वर्षांपासून सुमारे १० लाख रुपये आणि दरमहा ५ ते ७ लाख रुपये दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला.

याबद्दल सांगताना तो म्हणाला की, ‘कोणाला माहित आहे का, माझी मुले भारतात का आहेत आणि ते गेले ४५ दिवस शाळेत गेलेले नाहीत. शाळा मला दररोज लेटर पाठवत आहे की त्यांची खूप दिवसांपासून शाळेत अनुपस्थिती आहे. माझ्या मुलांना गेल्या ४५ दिवसांपासून बंधित ठेवण्यात आले आहे. परिणामी त्यांचे दुबईतील शालेय शिक्षण बुडत आहे. ती माझ्या मुलांची आई आहे आणि तिला उत्पन्न मिळत राहावं यासाठी मी तिच्या तीन चित्रपटांना कोट्यवधींची आर्थिक मदत केली. माझ्या मुलांसाठी ज्या आलिशान गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, त्यासुद्धा तिने स्वत:च्या खर्चासाठी विकल्या आहेत. मुंबईतील वर्सोवा याठिकाणी मी मुलांसाठी आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट विकत घेतला होता. माझी मुलं लहान असल्याने आलियाला त्या अपार्टमेंटची सह-मालक बनवण्यात आलं होतं. माझी मुलं दुबईत भाड्याच्या घरात राहत होती, तिथेही ती आरामात राहत होती. तिला फक्त पैसेच हवे आहेत आणि म्हणूनच तिने माझ्यावर आणि माझ्या आईवर अनेक खटले दाखल केले आहेत. हा तिचा जणू नित्यक्रमच झाला आहे. यापूर्वीही तिने हेच केलं होतं आणि तिच्या मागणीनुसार पैसे दिल्यानंतर केस मागे घेतली होती.’’

‘माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा हेतू’
आपल्या दोन मुलांविषयी त्याने लिहिलं, ‘माझी मुलं जेव्हा कधी सुट्टीत भारतात यायची, तेव्हा ते फक्त त्यांच्या आजीकडेच राहायचे. त्यांना घराबाहेर कोणीही कसं हाकलून देणार? मी स्वत: त्यावेळी घरात नव्हतो. जर ती कोणत्याही गोष्टीवरून व्हिडीओ बनवत असते तर मग तिने घरातून हाकलल्याचा व्हिडीओ का नाही बनवला? या नाटकात तिने माझ्या मुलांनाही ओढलं आहे आणि ती फक्त मला ब्लॅकमेल करण्यासाठी, माझी प्रतिष्ठा मलिन करण्यासाठी, माझी बदनामी करण्यासाठी हे सर्व करतेय. माझं करिअर उद्ध्वस्त करणं आणि तिच्या अयोग्य मागण्या पूर्ण करून घेणं हाच तिचा यामागचा उद्देश आहे.’

‘माझ्या मुलांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन’
‘कोणत्याही पालकांना त्यांच्या मुलांनी शिक्षण चुकवावं आणि त्यांच्या भविष्यात अडथळा निर्माण व्हावा, असं कधीच वाटणार नाही. ते नेहमीच त्यांना सर्वोत्कृष्ट गोष्टी देण्याचा प्रयत्न करतील. आज मी जे काही कमावतोय ते माझ्या मुलांसाठीच आहे आणि कोणतीही व्यक्ती याला बदलू शकत नाही. माझं शोरा आणि यानीवर खूप प्रेम आहे. त्यांचं भवितव्य सुरक्षित करण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन. मी आतापर्यंत सर्व खटले जिंकले आहेत आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एखाद्याला मागे खेचणं हे प्रेम नसतं पण त्याला योग्य दिशेने उडू देणं हे खरं प्रेम असतं’, असंही त्याने लिहिलं आहे.