‘सरपंच म्हणुन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील होते म्हणुन नक्षलवाद्यांनी माझ्या पतीचा चौकात गळा चिरला’

ज्येष्ठ समाजसेवक के.मधुकर राव यांच्या पंचशील आश्रमातील नक्षलपीडित पुष्पा गावडे यांनी व्यक्त केली वेदना

पुणे : नक्षलवादी हल्ल्यात पिडीत असलेल्या पुष्पा वसंत गावडे (Pushpa Vasant Gawde) म्हटल्या की, २००५ सालापासून मी माझी मुलगी पंचशील आश्रमामध्ये राहत आहोत. माझे पती सरपंच होते, ते गावाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील होते त्यामुळे नक्षलवाद्यांनी आमच्या घराला एक दिवशी घेराव घालून माझे पती माझा भाऊ आणि अन्य व्यक्तींना गावाच्या चौकात नेऊन त्यांचे गळे चिरले आणि त्यातून सांडत असलेले रक्त बाटलीत भरून तेथील नक्षलवाद्यांच्या स्मारकावर ओतले. त्यानंतर माझ्या मुलाचे आणि माझे जीवन जगणे कठीण झाले. त्यामुळे आम्ही गाव सोडून के.मधुकर राव यांनी सुरू केलेल्या पंचशील आश्रमात राहू लागलो. विवेक विचार मंच, राजे शिवराय प्रतिष्ठान व लोकशाही जागर मंच यांच्या वतीने विशेष संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सलवा जुडूम या नक्षल विरोधी मोहीमेचे नेते के.मधुकर राव यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना श्रध्दांजली, त्यांच्या कामाचा परिचय व्हावा या हेतूने सदर संवाद आयोजित केला असल्याचे जनसंघर्ष समितीचे प्रमुख दत्ता शिर्के यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी छत्तीसगड मधील बिजापूर जिल्ह्यातील गुंटूर येथून के.मधुकर राव यांनी सुरू केलेल्या पंचशील आश्रम या संस्थेचे अध्यक्ष राहुल मारगुनी, सचिव पुरुषोत्तम साहा, योगेश शाहू, ममता कोरसा व नक्षल पीडित महिला पुष्पा वसंत गावडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी स्वतः भोगलेल्या नक्षलवाद्यांच्या अमानवी अत्याचाराचा प्रसंग सांगताना पुष्पा गावडे यांना अश्रू अनावर झाले.

संस्थेचे अध्यक्ष राहुल मार्गोनी म्हणाले की, के. मधुकर राव यांनी एक लाख रुपये प्रति महिन्याची नोकरी सोडून नक्षलग्रगस्त भागातील मुलांसाठी काम केले. ते सलवा जुडुम मोहिमेत सक्रियपणे काम करत होते म्हणून २००५ मद्ये त्यांच्या घराला ३००-३५० नक्षलवाद्यांनी घेराव घालुन घरातील मंडळींना त्रास दिला. तरी के.मधुकर राव यांनी आपले काम थांबवले नाही. सलवा जुडुममध्ये सहभाग घेतल्यामुळे ज्या लोकांना गाव सोडावे लागले. त्यांना शासकीय पातळीवर प्रयत्न करून के. मधुकर रावांनी ‘स्पेशल पोलीस’ असे पद निर्माण करून दोन हजार लोकांना नोकरी द्यायला लावली. त्यासाठी त्यांनी कित्येक आंदोलन केली आणि मोर्चे काढले.

त्यावेळी के. मधुकर राव यांचे सहकारी पुरुषोत्तम साहा म्हणाले की, सलवा जुडूम चालू होण्याच्या आधी जून २००४ मध्ये एक अघोषित युद्ध सुरू झाले होते. दोन्ही बाजूंनी संघर्ष चालू होता. नक्षलवाद्यांकडून आणि जनतेकडूनही पण जनसामान्यापुढे रोजी रोटीचा प्रश्न होता. के. मधुकर राव यांच्यापुढे त्यांनी प्रश्न मांडले आणि त्यांनी ते रचनात्मक पद्धतीने सोडवण्यासाठी दिशा दिली. त्यानंतर सलवा जुडुमवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यानंतर या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे ठार झालेल्या व नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या मुलांसाठी के.मधुकर राव यांनी शाळा सुरू करून ‘छत्तीसगड समाज संस्था’ आणि पंचशील आश्रम यांची स्थापना केली. सध्या पंचशील आश्रमात 55 मुले आणि 50 मुली शिक्षण घेतात.

यावेळी पंचशीला आश्रमाच्या व्यवस्थापक ममता कोरसा म्हणाल्या की, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या लोंकाची मुले इकडे तिकडे भटकतात. त्यांना एकत्रित करून त्यांची निवास, भोजन व शिक्षणाची सोय के. मधुकर राव यांनी केली. यावेळी उपस्थितांनी आपले प्रश्न विचारुन प्रत्यक्ष नक्षलवादाचे वास्तव आणि पीडितांचे दु:ख जाणुन घेतले.

राजे शिवराय प्रतिष्ठान च्या वतीने जेष्ठ समाज सेवक स्वर्गीय ज्ञानेश पुरंदरे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा ज्ञानेश सेवा समर्पण पुरस्कार स्व. के मधुकर राव यांना घोषित करण्यात आला. विवेक विचार मंच (Vivek Vichar Manch) चे सागर शिंदे यांनी प्रमुख मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले.