केंद्र सरकार 10 लाख सरकारी नोकऱ्या देणार, जाणून घ्या कोणत्या विभागात सर्वाधिक जागा रिक्त आहेत
नवी दिल्ली : सरकारी नोकरीच्या आघाडीवर केंद्रातील मोदी सरकारने (BJP Gov) देशातील तरुणांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केंद्रीय मंत्रालये आणि विभागांना येत्या 18 महिन्यांत 10 लाख भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. देशातील बेरोजगारीचा (Unemployment) मुद्दा विरोधक सातत्याने उचलून धरत असताना ही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान कार्यालयाने ( Prime Minister’s Office) ट्विट केले की, ‘पंतप्रधानांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मानव संसाधनाच्या स्थितीचा आढावा घेतला आणि सरकारने पुढील 1.5 वर्षांत मिशन मोडमध्ये 10 लाख कर्मचाऱ्यांची भरती करावी, असे निर्देश दिले.’
PM @narendramodi reviewed the status of Human Resources in all departments and ministries and instructed that recruitment of 10 lakh people be done by the Government in mission mode in next 1.5 years.
— PMO India (@PMOIndia) June 14, 2022
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra Singh) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला संसदेत सांगितले की 1 मार्च 2020 पर्यंत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये 8.72 लाख पदे रिक्त आहेत. केंद्र सरकारने आपल्या विविध विभागांमध्ये 40 लाखांहून अधिक पदे मंजूर केली आहेत, परंतु सध्या 32 लाखांपेक्षा कमी कर्मचारी कार्यरत आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी सरकार अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे, मात्र त्यात फारसे यश आले नाही. पोस्ट, डिफेन्स (सिव्हिल), रेल्वे आणि महसूल यासारख्या मोठ्या मंत्रालयांमध्ये आणि विभागांमध्ये बहुतेक रिक्त पदे आहेत.
रेल्वेमध्ये (Railways) सुमारे 15 लाख मंजूर पदांपैकी सुमारे 2.3 लाख पदे रिक्त आहेत. संरक्षण (नागरी) विभागात सुमारे 6.33 लाख कर्मचाऱ्यांच्या मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे 2.5 लाख पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागामध्ये एकूण मंजूर 2.67 लाख कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 90,000 जागा रिक्त आहेत, तर महसूल विभागात, 1.78 लाख कर्मचाऱ्यांच्या एकूण मंजूर संख्येच्या तुलनेत सुमारे 74,000 रिक्त पदे आहेत. गृह मंत्रालयात मंजूर १०.८ लाख पदांपैकी सुमारे १.३ लाख पदे रिक्त आहेत.