‘पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या चूकीवर हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा’

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) काल रद्द करण्यात आली. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते.विशेष म्हणजे पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्यसरकारने तपास न करता हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली.

पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसने राजकारण करायला सुरुवात केली आहे. मात्र या सुरक्षेची जबाबदारी एसपीजी, आयबी आणि राज्यसरकार पोलिस या तिघांची असते. त्यामुळे चूक कुणाकडून झाली हे जेव्हा हायकोर्टाच्या सिटींग न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास होईल तेव्हा सत्य काय आहे हे देशाच्या जनतेसमोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले. केंद्रसरकार व राज्यसरकार चौकशी करेल त्यावेळी संशयाला वाव निर्माण होईल असेही नवाब मलिक म्हणाले.