‘काय शिवसेनेची अवस्था झाली आहे… कुठलीही निवडणूक आली की आमदारांना हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं’

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेकडून (Shivsena) आपले आमदार फुटू नयेत,यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत दाखल व्हा, असा आदेश दिल्याची माहिती आहे. शिवसेना आमदार मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या एका आमदाराचेही मत फुटणे, ठाकरे सरकारला परवडण्यासारखे नाही. यामुळेच मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आता या सर्व घडामोडींवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh rane) यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, काय शिवसेनेची अवस्था झाली आहे… कुठली ही निवडणूक आली ज्यामध्ये आमदारांचं मतदान होणार असेल तर बॅगा भरून आमदारांना बस मध्ये टाकून हॉटेलमध्ये कोंबण्यात येतं. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाल्यापासून ही लपवालपवी शिवसेनेसाठी काही नवीन नाही, मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना कळलंच नाही. असं ते म्हणाले.