वंदे मातरम म्हणण्याच्या मुनगंटीवारांच्या आदेशाला रझा अकादमीचा विरोध

मुंबई – खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम (Vande Mataram) असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

पुढच्या 26 जानेवारीपर्यंत प्रत्येकाची मानसिक तयारी अशी व्हावी की, ‘वंदे मातरम’पासून दिवसाची किंवा संवादाची सुरूवात व्हावी. विधानसभेच्या अधिवेशनाची सुरूवातही वंदे मातरमने मी करतो. त्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येकाने या अभियानामध्ये सहभागी व्हावं, असं आवाहनही मुनगंटीवार यांनी केलं आहे. येत्या 18 तारखेला याबाबतचा अधिकृत जीआर काढणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्य सरकारच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वंदे मातरम म्हणण्याच्या आदेशाला रजा अकादमीचा विरोध आहे. रजा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी यांनी सरकारच्या निर्णयाला विरोध दर्शविला. आमच्यात फक्त अल्लाहची पूजा होते. म्हणून त्याऐवजी सरकारने काही दुसरा पर्याय द्यावा जो सर्वाना मान्य असेल. याबाबत आम्ही उलेमा आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सरकारला पत्र लिहिणार असल्याचं रझा अकादमीचे सईद नुरी (Saeed Noori) यांनी सांगितलं.