राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता

मुंबई – शिवसेना आणि भाजप (Shiv Sena and BJP) या दोन्ही पक्षांनी राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. (rajya-sabha-elections) राज्यसभेची सहावी जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा निर्धार दोन्ही बाजूच्या नेत्यांनी व्यक्त केला असून या निवडणुकीत विरोधी पक्षाला धूळ चारण्यासाठी दोन्ही पक्षातील दिग्गज नेते व्यूहरचना करत आहेत. यातच एकमेकांवर घोडेबाजार करत असल्याचा देखील आरोप केला जात आहे.

शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत लागली आहे. सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीला प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे. दरम्यान, आता दोन्ही बाजूने विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आता कोण उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अजूनही त्यावर उत्तर आलं नाही म्हणून सपा नेते नाराज आहेत. जर मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधला नाही तर सपा तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता आहे.

नुकतेच आमदार अबू आझमी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अल्पसंख्याक समाजासाठी काय केलं? असा प्रश्न विचारला आहे. एवढंच नाही तर महाविकास आघाडी सरकार सेक्युलर आहे की हिंदुत्ववादी ज्याची चर्चा उद्धव ठाकरे हल्ली फारवेळा करतात ते एकदा सांगाच असं अबू आझमी यांनी म्हटलं आहे.