आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर देवेंद्र फडणवीस यांच्या ज्ञानात भर पडेल…

मुंबई : लखीमपूरचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्न उपस्थित केले. मावळच्या घटनेचा उल्लेख केला गेला. मावळ येथे शेतकऱ्यांच्या मृत्यूला राज्यकर्ते नाही तर पोलीस जबाबदार होते. त्या घटनेलाही बराच काळ उलटून गेला आहे. तरीही माजी मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा उल्लेख केला. मावळचे चित्र आज बदलले आहे. ज्यांच्यावर त्यावेळी मावळवासियांनी आरोप केले होते, त्यांचा या घटनेत काहीही हात नसल्याचे लक्षात आले. उलट भाजपच्या काही नेत्यांनी भडकावल्यामुळे त्याकाळी स्थानिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एनसीबी, ईडी, आयकर विभाग या यंत्रणांवर भाष्य केलेच शिवाय लखीमपूर हिंसाचारात युपी सरकारवर निशाणा साधला तर बंदमध्ये सहकार्य केलेल्या राज्यातील जनतेचे आभार मानले आणि पक्षाची भूमिकाही स्पष्ट केली.

दर्ञान, मावळ तालुक्यात जनसंघ आणि नंतर भाजपचे वर्चस्व होते. रामभाऊ म्हाळगी हे मावळचे लोकप्रतिनिधी होते. आज मावळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील शेळके हे ९० हजार मताधिक्याने निवडून आलेले आहेत. फडणवीस यांनी मावळचा उल्लेख केला ते बरं केले, कारण त्यांना आजची मावळची परिस्थिती काय आहे हे समजून घेतले तर त्यांच्या ज्ञानात भर पडेल असा टोलाही शरद पवार यांनी लगावला.