“बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला अमेरिकेत पाठवतोय”, म्हणणाऱ्यांना शरद पोंक्षेंचे तिखट प्रत्युत्तर

मराठी मनोरंजनसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) यांच्या मुलीनेही अभिमानास्पद कामगिरी केली आहे. शरद पोंक्षे यांची लाडकी मुलगी सिद्धी पोंक्षे (Siddhi Ponkshe) हिचे वैमानिक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मात्र मुलीच्या यशाबद्दल माहिती देणारी सोशल मीडिया पोस्ट केल्यापासून शरद पोंक्षेंवर टीकेची भडिमार होत आहे. सामान्य सोशल मीडिया वापरकर्त्यांपासून ते मराठी कलाकारापर्यंत अनेकांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. आता शरद पोंक्षेनी त्यांना सुनावणाऱ्यांना तिखट प्रत्युत्तर दिले आहे.

ट्रोलिंगबद्दल शरद पोंक्षे म्हणाले, “फालतूतला फालतू माणूस, ज्याची लायकी नाही, ज्याने दोन ओळी कधी आयुष्यात वाचल्या नाहीत तो उठतो आणि ट्रोल करतो. त्याला काही निती-नियम नाही, त्याला काही संहिता नाही, त्याला कुठले कायदे-कानून नाही. खोट्या नावांनी अकाउंट्स उघडतात, भन्नाटच काहीतरी नावाने अकाउंट्स असतात. कोणीही कोणाला शिव्या देतं आपण बघायला गेलो तर प्रोफाईल लॉक असते. सगळं इतकं गलिच्छ आहे, कुठे चाललोय आपण? मला एखाद्याची मतं नाही पटत तर ठिक आहे. आपल्याला जन्मदात्या आई-वडिलांचं पटत नाही. नवरा बायकोची मतं पटत नाही, मग ती चर्चेत नाही घ्यायची, सोडून द्यायची.”

“आत्ताचं उदारहरण घ्या. वर्षभरापूर्वी माझी मुलगी पायलट व्हायला अमेरिकेला गेली. विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, यासाठी माझ्या व्याख्यानामधले काही रील्स मी सातत्याने सोशल मीडियावर टाकत असतो. त्याखाली कमेंट्स असायच्या. हा बघ, बहुजनांच्या पोरांची माथी भडकवतोय आणि स्वतःच्या पोरीला मात्र अमेरिकेत पायलट व्हायला पाठवलं. आता हे बोलताना त्यांना हे माहीत नाही की गांधीजी, आंबेडकर, सावरकरदेखील परदेशातच शिकायला गेले होते. सगळी माणसं परदेशातच शिकायला गेली होती. परदेशात शिकायला जाणं काही पाप नाही. चांगलं शिक्षण हवं असेल आणि जर ते आपल्याकडे नसेल तर जाईल ना माणूस. त्यात काय प्रॉब्लेम आहे. आता तर सगळं ग्लोबल झालंय, जग जवळ आलंय,” अशा शब्दांत त्यांनी मुलीवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

पुढे ते म्हणाले, “पोस्ट कुठली आहे, काय लिहिलं आहे, कशावर काय बोलतो आपण, कशाचा काहीच संबंध नसतो. मग ही गाढवं आहेत असा मी विचार करतो आणि मला त्यांच्याबाबतीत वाईट वाटतं. मला डबक्यातल्या बेडकाची गोष्ट आठवते, त्याला वाटतं की हाच समुद्र आहे. अशी त्यांची अवस्था आहे. ते ज्या नेत्यांच्या मागे धावतात, तेही त्यांना तसंच भडकवतात. सगळं फार गलिच्छ होऊन बसलंय म्हणून आपल्याकडची लोकशाही अपयशी आहे,” असं शरद पोंक्षे म्हणाले.