अशा’ प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात – खासदार सुळे

मुंबई– महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,मात्र अशाप्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असे बोलणे-वागणे ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी ट्वीटद्वारे व्यक्त केली आहे.

राजकारणात सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्यापद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे असेही खासदार सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणे स्वाभाविक असले तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले आहे.

राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल खासदार सुळे यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे.