नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतील भाजपचे यश असामान्य; सुनील देवधर यांचा दावा

पुणे  – प्रस्थापित सरकार सर्वांचेच समाधान करू शकत नाहीत, त्यामुळे सत्ताधार्यांच्या विरोधात आपोआप जनमत निर्माण होते. त्यात कोरोना सारख्या शतकातून एखाद्या वेळेला उद्भवणार्या आपत्तीत त्याची तीव्रता अधिक असते. मात्र दोन वर्षांचा कोरोना काळ आणि तीन लाटेवर मोदी सरकारची धोरणे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले सेवा कार्य याच्या जोरावर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मिळविलेले यश असामान्य असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस सुनील देवधर यांनी व्यक्त केले.

शहर भाजपने आयोजित केलेल्या पदाधिकार्यांच्या बैठकीत देवधर मार्गदर्शन करीत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रभारी धीरज घाटे, सरचिटणीस दत्ता खाडे, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

देवधर म्हणाले, ‘कोरोनाच्या लाटेचे मोदी सरकारने उत्तम प्रकारे व्यवस्थापन केले. योग्य वेळी टाळेबंदी केली, जनमत मजबुत केले, एकात्मता साधली, स्वदेशीचा नारा देत आरोग्य विषयक सुविधा उभारल्या, त्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध करून दिले, वितरण व्यवस्था चोख ठेवली, अन्नधान्य पुरविले, २० लाख कोटींचे आत्मनिर्भर पॅकेज दिले. त्यामुळे मोदींनी देशाला वाचविले ही भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती. परंतु केवळ मोदींना विरोध करण्याच्या नादात विरोधी पक्ष देश आणि समाजाच्या भावनांना विरोध करीत राहिला, त्यामुळे त्यांची जनतेच्या मनातील छबी कमी होत गेली. त्या उलट मोदींनी जगभरात वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीचा जगाला परिचय दिला. जनतेने मोदींनी जे सांगितले ते केले. त्यामुळे सरकारच्या विरोधात कुठलीच नाराजी नव्हती. हे सरकार परत आले पाहिजे या भावनेतून भाजपचा विजय झाला.’

देवधर पुढे म्हणाले, शेतकरी, बेरोजगार, गरीब, अपंग, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना विविध योजनांचे लाभ मिळाले. एकप्रकारे लाभार्थ्यांची मतपेढी (व्होटबॅंक) निर्माण झाली. ज्याचा भाजपला फायदा झाला. उत्तर प्रदेशमध्ये योगींची लोकप्रियता, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती योग्य पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य, विकासकामे, परिवारवादाला विरोध आणि भ्रष्टाचाराला पायबंद केल्याने यश मिळाले, तर उत्तराखंडामध्ये एका वर्षात तीन वेळा मुख्यमंत्री बदलूनही युवा आणि शक्तिशाली चेहर्यावर जनतेने विश्वास टाकला. गोव्यात सरकारने चांगले काम केले होते. तेथे देवंद्र फडणवीस यांनी केलेले निवडणूक व्यवस्थापन विशेषत: उमेदवार निवड प्रक्रिया महत्त्वाची ठरली. मणिपूरमध्ये दहशतवादाचा पाडाव, पायाभूत सुविधा विशेषत: रस्ते, रेल्वे, विमानसेवा, संपर्कासाठी मोबार्इल नेटवर्क व्यवस्था यामुळे यश मिळाले. मुळीक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पांडे यांनी परिचय करून दिला. नागपुरे यांनी सूत्रसंचालन केले. मेंगडे यांनी आभार मानले.