ओबीसी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होत नाही तो पर्यंत लढा सुरूच राहील – छगन भुजबळ

नागपूर :- नागपूर येथील संविधान चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने स्वाधारच्या धर्तीवर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आधार योजना लागू करण्यासह वसतिगृह, शिष्यवृत्तीसह विविध प्रश्नांवर साखळी उपोषण करण्यात येत आहे. आज नागपूर दौऱ्यावर असताना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्या प्रा.दिवाकर गमे यांच्यासह कार्यकर्त्यांची भेट घेतली.

यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष बापू भुजबळ, नागपुर जिल्हा संघटक मनोज गणोरकर, महिला अध्यक्ष विद्या बहेकर, महानगर कार्याध्यक्ष आरिफ काझी, मिलींद पाचपोर, कविता मुंगळे, आरती पाचघरे, सुनयना यवतक, विशाल हजारे, विनय डहाके यांच्यासह समता परीषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, ओबीसींच्या विविध प्रश्नावर आपला लढा कायम सुरू आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधारच्या धर्तीवर आधार योजना लागू करणे, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह निर्माण करण्यासाठी आपला शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण उपसमितीच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी आपला लढा सुरूच राहील असे त्यांनी सांगितले.

दरम्यान संविधान चौकातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व उपोषणस्थळी सर्व महापुरुषांच्या प्रतीमेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले.