राष्ट्रवादीकडून फोडाफोडी सुरूच; रात्री बारा वाजता केला ‘या’ बड्या नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश

सोलापूर  – भाजपचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस बिजू अण्णा प्रधाने, माजी नगरसेवक, सुभाष डांगे, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, सुनील भोसले,किशोर पाटील, सुरेश पाटील, यांनी सोमवारी रात्री राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रात्री बारा वाजता भाजपचा करेक्ट कार्यक्रम करत भाजपच्या शिलेदारांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला.

प्रत्येक आमदारला हाताळून सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला मात्र १७० आमदारांच्या जोरावर सरकार मजबूत उभे आहे आणि महाराष्ट्रात परिवर्तन घडवत आहे असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. सत्ता नसली की माणसाचे संतुलन बिघडते, भाजपची तशी परिस्थिती झाली आहे असा थेट आरोप जयंत पाटील  पक्षप्रवेशाच्यावेळी केला.

बिजू अण्णा ज्या भाजप पक्षात काम करत होते तिथे कार्यकर्त्यांना गरजेपूरते वापर करण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

भाजपच्या अनेक लोकांच्या मनात पक्ष सोडण्याची तयारी आहे. बिजू अण्णा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता अनेकजण राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतील. सोलापूर जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल. येत्या मनपा निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळवून हे काम करायचे आहे असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.